मुंबई : प्रतिनिधी : ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा, बेस्ट सोसायटीतील दारुन पराभव अशा राजकीय घटना घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या. शिवसेना शिंदे गटाने तर राज ठाकरे यांचे महायुतीत स्वागत केले जाईल, अशी प्रतिक्रिया देऊन टाकली. (Raj Thackeray met CM)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि त्यात मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले. त्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या क्रेडिट सोसायटीत शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेने एकत्र येत पॅनेल उभे केले. पण या निवडणूकीत शिवसेना मनसे पुरस्कृत पॅनेलचा दारुण पराभव झाला. बेस्टचा निकाल लागल्यावर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने ठाकरे बंधूंच्या युतीचे काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. (Raj Thackeray met CM)
यापूर्वीही फडणवीस आणि राज ठाकरे यांची दोन महिन्यापूर्वी ताज लँडसमध्ये भेट घेतली होती. पण आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट नागरिकांच्या समस्येसंबधी घेतली होती अशी माहिती पुढे आली आहे. काही दिवसापूर्वी कुर्ला येथील नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. कुर्ला मदर डेअरीची २१ एकर जागा धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी दिली आहे. त्या ठिकाणी उद्यान उभारावे अशी मागणी कुर्ला वासियांनी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा करुन राज्य सरकार दखल घेत नसल्याने तेथील आंदोलनकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करु असे आश्वासन आंदोलक आणि नागरिकांना दिले होते. . कुर्ला वासियांच्या समस्ये संदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. (Raj Thackeray met CM)
दरम्यान राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर या भेटीचे शिवसेना शिंदे गटाने स्वागत केले आहे. राज ठाकरे महायुतीत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची घेतलेल्या भेटीसंबधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारले असताना ते म्हणाले आम्हाला माहिती आहे, त्यांनी भेट का घेतली. पण तुम्हाला कशाला सांगू? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते गणपतीचे आमंत्रण द्यायला आले असतील किंवा राज्यासंदर्भात काही प्रश्न असतील त्या संदर्भात भेटायला गेले असतील असे संजय राऊत म्हणाले. दोघांच्या भेटीने आम्हाला त्रास झालेला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणांमध्ये विरोधी पक्षातील नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात असेही ते म्हणाले. (Raj Thackeray met CM)