बिहार हे देशातलं सर्वाधिक राजकीयदृष्ट्या जागृत राज्य मानलं जातं. बिहारच्या रंगमंचावर घडणा-या घटना नेहमीच देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. बॉलीवूडच्या सिनेमांमध्येही इथल्या राजकारणाचं बटबटीत दर्शन घडत असतं. बॉलीवूडच्या चित्रपटांनाही मागे टाकेल असं नाट्य बिहारच्या राजकीय रंगमंचावर बघायला मिळतं. जन सुराज्य पक्षाची स्थापना करून निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकारणात रंगत आणली होती. परंतु त्यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊन स्वतःचं हसं करून घेतलं आहे. पीकेंनी माघार का घेतली याची चर्चा बिहारबरोबरच देशाच्या राजकारणात रंगली आहे.
विजय चोरमारे
प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये पदयात्रा काढून वातावरण ढवळून काढलं होतं. त्यामुळं ते कुणाचा खेळ बिघडवणार आणि कुणाला सत्तेपर्यंत नेणार, याची चर्चा रंगली होती. त्याचबरोबर त्यांनी बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनाच आव्हान दिलं होतं. “स्मृती इराणींनी जसं राहुल गांधींना अमेठीत पराभूत केलं, तसंच मी तेजस्वी यादवला राघोपुरमधून हरवेन.” अशी बढाई त्यांनी मारली होती. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीचं वातावरण रंगलं आणि त्यांनी स्वतःच मैदानातून पळ काढला. पराभव एवढा स्पष्ट दिसू लागला की, प्रशांत किशोर यांनी निवडणूक लढवण्यालाच नकार दिला, अशी चर्चा बिहारमध्ये रंगू लागली आहे. (Prashant Kishor’s withdrawal)
फार लांबची गोष्ट नाही. पाचसहा दिवसांपूर्वी म्हणजे ११ ऑक्टोबरला प्रशांत किशोर म्हणाले होते, “राहुल गांधींचं जे अमेठीत झालं, तेच तेजस्वी यादवचं राघोपूरमधून होणार!” म्हणजे -अमेठीत पराभव, वायनाडला पलायन, आणि नंतर रायबरेलीला वापसी. प्रशांत किशोर यांच्या म्हणण्याचा तसाच अर्थ होता. “ प्रशांत किशोर यांच्या भीतीमुळं तेजस्वी यादव यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यातून राघोपुरमधून पळ काढावा लागेल.” मात्र जेव्हा प्रशांत किशोर स्वतः राघोपुरला गेले. तिथलं वातावरण पाहिलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की, इथं आपला निभाव लागणार नाही. त्यांनी निवडणूक लढण्याचा विचारच सोडून दिला. (Prashant Kishor’s withdrawal)
तेजस्वी यादवना आव्हान देणारे पीके स्वतःच मागे हटले.
प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादवना आव्हान दिलं होतं. त्याचवेळी माध्यमांमध्ये बातमी आली की तेजस्वी दोन मतदारसंघातून लढणार आहेत. मधुबनी जिल्ह्यातील फुलपरास ही त्यांची दुसरी जागा असेल, असं सांगितलं जात होतं.ही बातमी समजताच प्रशांत किशोर म्हणाले होते, “ तेजस्वी दुसरी जागा लढणार आहेत, याचा अर्थ राघोपुरमधील त्यांचा पराभव ठरलेला आहे. अगदी राहुल गांधींसारखा.”
प्रशांत किशोर यांचं हे विधान बिहारपुरतं मर्यादित नव्हतं. “राहुलसारखी अवस्था होईल” असं म्हणत त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. प्रशांत किशोर यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता. माध्यमांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं. आणि बिहारच्या लोकांनाही वाटत होतं, की आता बिहारमध्येही अमेठीची पुनरावृत्ती होणार, अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली होती.
प्रशांत किशोर यांनी निर्माण केलेलं हे वातावरण दोन दिवसही टिकलं नाही. बढाई मारल्याच्या चौथ्या दिवशीच सगळा खेळ खल्लास झाला. चौथ्याच दिवशी प्रशांत किशोर यांनी घूमजाव केलं. आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा त्यांनी करून टाकली. इथं आणखी एक विरोधाभास समोर आला होता. म्हणजे एखादा बंडखोर नेता कुणाला आव्हान देतो, तर सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला. अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीतून थेट पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं होतं. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. (Prashant Kishor’s withdrawal)
केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याही विरोधात निवडणूक लढवली होती. मुख्यमंत्र्यांना हरवून ते मुख्यमंत्री बनले होते. याउलट प्रशांत किशोर यांनी कुणावर नेम धरला होता, तर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यावर. तिथूनही त्यांनी पळ काढला.
प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नीतिश कुमार यांना आव्हान दिलं असतं, किंवा भाजपच्या एखाद्या उपमख्यमंत्र्याविरोधात रणशिंग फुकलं असतं तरी हरकत नव्हती. परंतु सत्ताधाऱ्यांना बाय देऊन ते विरोधी नेत्याच्या मागे लागले. प्रत्यक्ष वातावरण बघून मागे हटले. बिहारमधली निवडणूक सुरू होण्याच्या आधीच तेजस्वी यादव आणि महागठबंधनचा आत्मविश्वास त्यामुळं वाढल्याचं मानलं जातं.
प्रशांत किशोर तेजस्वी यादव यांच्याविरोधात लढले असते तर ते तिस-या क्रमांकावर राहिले असते की चौथ्या, असाही प्रश्न विचारला जातोय. कारण ज्यांन राघोपूरची वस्तुस्थिती माहिती आहे, त्यांना तेजस्वी यादव यांच्या विजयाबद्दल शंका नाही. कारण लालूप्रसाद यादव यांचा तो बालेकिल्ला आहे.
वैशाली जिल्ह्यातील राघोपुर हा लालूप्रसाद यादव यांच्या राजवटीपासून यादव कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. २०२० मध्ये तेजस्वी यादवृ यांनी इथून मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. २०१५ मध्येही आरजेडीनं वर्चस्व राखलं होतं. याच मतदारसंघातून लालू प्रसाद आणि राबडी देवी दोघेही आमदार झालेले आहेत.
इतकं सगळं असतानाही प्रशांत किशोर यांनी तिथं जाण्याचा प्रयत्न केला. गेली तीन वर्षं ते या मतदारसंघावर लक्ष ठेवून होते. त्यांच्या आत्मविश्वासापेक्षाही अहंकार शिगेला पोहोचला होता. त्याचमुळं ते तेजस्वीला “नववी नापास” म्हणून हिणवत होते. पण अखेरच्या क्षणी त्यांनी मैदानातून पळ काढळा.
२०१४ साली केंद्रात मोदी आणि २०१५ साली बिहारमध्ये नीतीश यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून मिरवणारे रणनीतिकार असलेले प्रशांत किशोर, स्वतःच्या बाबतीत मात्र कमालीचे सावध बनले. मैदानात उतरण्यापूर्वीच त्यांनी शस्त्रं टाकली. त्यासाठी त्यांनी कारण पुढं केलंय, ते म्हणजे – मला पक्षाच्या सर्व उमेदवारांकडं लक्ष द्यायचं आहे. “मी स्वतः निवडणूक लढणार नाही, कारण मला सर्व उमेदवारांच्या विजयाकडं लक्ष द्यायचं आहे,” अशं ते म्हणाले. सोशल मीडियावर “पीके घाबरले!” असं म्हणून लागलेत.
२०२२ मध्ये स्थापन झालेल्या जन सुराज्य पक्षाने २०२५ च्या निवडणुकीत २४३ जागांवर लढण्याचा दावा केला आहे. त्यांच्याकडं एकही दमदार चेहरा नाही, मात्र १५० जागा जिंकण्याचा दावा ते करताहेत.
तेजस्वी यादव यांनी लालू प्रसाद आणि राबडी देवी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. हजारो समर्थकांच्या गर्दीतला त्यांचा आत्मविश्वास प्रशांत किशोर यांच्यासाठी पुरेसा स्पष्ट इशारा होता. जेव्हा मतदारसंघातला पाया मजबूत असतो तेव्हा रणनीतीचा उपयोग होत नसतो, हे प्रशांत किशोर यांच्या लक्षात आलं. त्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील, हे निवडणुकीनंतर कळेल. पण स्वतःचा पराभव वाचवणारे रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर निश्चितपणे लक्षात राहतील. (Prashant Kishor’s withdrawal)