मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेतील अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांकडून तीव्र टीका होत आहे. त्यांचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही त्यांच्यावर कडाडून हल्ला केला आहे. तांबेंचे विधान बेजबाबदार आणि बालिशपणाचे आहे. काँग्रेसने त्यांना भरपूर काही दिले आहे. त्यांचे त्यांनी ऋण ठेवावयास हवे, अशा शब्दांत सोमवारी (२ जून) टीका केली. (Thorat criticizes Tambe)
राहुल गांधी हे सहजासहजी कोणत्याही नेत्याला भेटत नाहीत, राज्यातील काँग्रेसच्या कोणत्याही एका नेत्याने एका तासात भेट मिळून दाखवावी, असे उपरोधिक आव्हान तांबे यांनी दिले होते. त्याबाबत मुंबईत पत्रकारांशी बोलताना काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, तांबेंचे विधान अत्यंत बालिशपणाचे आहे. आपल्यासाठी ज्यांनी काही केले त्याचे ऋण ठेवले पाहिजे. राजकीय जीवनात काँग्रेस पक्षाने त्यांना खूप काही दिले आहे. त्यांना अजून खूप शिकायचे आहे. आपण काय बोलतो, काय करतो? याचे आत्मचिंतन त्यांनी करावे असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेश पाटील, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते चरणजित सिंह, प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते. (Thorat criticizes Tambe)
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या
महाराष्ट्राला मन्सूनपूर्व पावसाने झोडपले आहे. सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले. पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही थोरात यांनी केली.
हेही वाचा :
मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना करा
भूस्खलनात तीन जवानांचा मृत्यू