पनवेल : प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कोणीच नव्हते, स्वातंत्र्याच्या लढाईत सर्व कॉम्रेड होते, असा निशाना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि आरएसएस वर साधला. शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहणे होते. (Raut in Panvel)
या मेळाव्याला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, माजी आमदार राजू पाटील , शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील देखील मंचावर उपस्थित होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला आलो आहोत. ही शेतकरी कामगार पक्षाची पुण्याई आहे, आमच्या वाटेला सतत संघर्ष आला आहेत. सातत्याने कार्यकर्ते लढे देत आले आहेत, तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते एकेकाळी आमचे हिरो होते, त्यांच्याकडून आम्ही राजकारण शिकलो. (Raut in Panvel)
खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. हा महाराष्ट्र गौतम अदानी आणि अंबानी यांनी निर्माण केला नाही. हा महाराष्ट्र ज्यांनी निर्माण केला त्यामध्ये शेतकरी, गिरणी कामगार आणि हा लाल बावटा सगळ्यात पुढे होता असे राऊत म्हणाले. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कोणीच नव्हते, स्वातंत्र्याच्या लढाईत सर्व कॉम्रेड होते. तसेच अख्या रायगड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी समाज हा महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होता, म्हणून आताच्या घडीला या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांना भोगता येत आहे, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात मी फिरतो. २५ वर्षे मी दिल्लीमध्ये आहे. तिथे पाहिलं तर जो काम करणारा व्यक्ती आहे तो कॉम्रेड लाल बावटा आहे. नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी नाहीत त्यांनी देश अंबानीला विकला, तसेच, देश आणि मुंबई विकली, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला आनंद झाला. मराठी माणसासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह सर्व संघटनांनी एकत्र येत लढा दिला पाहिजे तर या महाराष्ट्राचा विकास नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Raut in Panvel)