कोल्हापूर : प्रतिनिधी : सध्या संपूर्ण जग पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात असताना निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेणे काळाची गरज आहे. त्यामुळे आज शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पृथ्वी दूत म्हणून घेतलेली शपथ उद्या जागतिक पातळीवर घेतली जाईल. केवळ महाराष्ट्र आणि भारतापुरता हा संकल्प नसून आशिया खंडातील अनेक संस्था यामध्ये सहभागी होतील. येत्या काळात आशिया खंडामध्ये लाखो वृक्षांची लागवड आणि संवर्धन केले जाईल, असा विश्वास आशिया पॅसीफिक क्वालिटी नेटवर्कचे अध्यक्ष आणि जागतिक शिक्षणतज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केला.
मिशन एंजल फॉर अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट( माई)या संकल्पने अंतर्गत शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या एक हजार विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. यावेळी प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये दहा झाडे लावण्याचा तसेच दहा दुर्मिळ झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. वनसंपदा संरक्षण, हरित ऊर्जा, प्लास्टिक व रासायनिक प्रदूषणाला आळा, आणि पर्यावरण पूरक जीवनशैली या पंचसूत्रीचा पुरस्कार हे नव्या पिढीचे पृथ्वीदूत करणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. (Collective pledge for environmental conservation)
डॉ. पाटील म्हणाले, “विद्यार्थी-विद्यार्थिनी ही देशाची भावी पिढी असून त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी समाजात संवादक म्हणून काम करणे अत्यावश्यक आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास सुरू असून तो वेळीच रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून पर्यावरण विषयक जागृती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविल्यास येत्या काही वर्षांत करोडो झाडांची निर्मिती होऊ शकते. यामुळे तापमानवाढीसह विविध पर्यावरणीय समस्यांवर आळा बसण्यास निश्चितच मदत होईल”. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींची आणि त्यांनी लागवड केलेल्या सर्व झाडांची माहिती ही वेबसाईटवर ठेवण्यात येणार आहे. तसेच पूर्वीपासून असलेल्या वृक्षांचे संवर्धन, संगोपन या सर्व बाबी या संबंधित वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना विशेष पारितोषिकाने सन्मानित करण्यात येईल, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले. (Collective pledge for environmental conservation)
‘मिशन एंजल फॉर अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट’ या प्रोजेक्टअंतर्गत भारतासह आशिया खंडातील विविध संस्थांना एकत्र जोडून येत्या काळात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आणि एशिया पॅसिफिक कॉलिटी रजिस्टर यांच्या या मोहिमेचे नेतृत्व डॉ. जगन्नाथ पाटील करत आहेत.
शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी २९ जानेवारी हा दिवस ‘पृथ्वी संरक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो. गेल्या पाच वर्षांत शहीद शिक्षण प्रसारक मंडळामार्फत २५ हजारांहून अधिक झाडे लावून त्यांचे यशस्वीरित्या संगोपन करण्यात आले आहे.
यावेळी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर, शहीद सिताराम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या प्रा. स्नेहल माळी, शहीद सिताराम पाटील कॉलेज ऑफ पी.जी.च्या प्राचार्या प्रा. सिद्धता गौड, शहीद सिताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य प्रा. हिमांशू चव्हाण, मुक्ताई नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सरिता धनवडे, शहीद पब्लिक स्कूलचे प्राचार्य जयदीप चरापले, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. व्ही.व्ही. किल्लेदार यांच्यासह उपप्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (Collective pledge for environmental conservation)