मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व अनेक राज्यात आल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून शिक्षण क्षेत्रातही माफियाराजचा धुडगुस सुरु आहे. नीट (NEET) चा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची नामुष्की ओढवली आहे. पेपर लिक करणारे माफिया मोकाट असून याप्रकरणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांची हकालपट्टी करून अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. (Arrest Abhishek Singh in connection with the NEET paper leak case)
यासंदर्भात ते म्हणाले की, ३ मे रोजी नीट ची परिक्षा देशभर पार पडली. वर्षभर अभ्यास करून विद्यार्थ्यांनी परिक्षेला सामोरे जायचे आणि या अत्यंत महत्वाच्या परिक्षांचे पेपर लिक होतात हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी मांडलेला खेळ आहे. आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे, फेरपरीक्षेमुळे केवळ २२. ६९ लाख विद्यार्थ्यांनाच नाहक त्रास होणार नाही तर २२.६९ लाख कुटुंबांना त्याचा त्रास होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा नीट परिक्षेत गडबड झाली आहे. २०२४ साली पेपरफुटी झाली होती, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरुवातीला पेपर फुटीचे आरोप फेटाळले होते, परंतु नंतर बिहार आणि हजारीबाग येथे गैरप्रकार झाल्याचे मान्य केले होते व दोषींवर कारवाईचे आश्वासनही दिले होते पण त्यात काही फरक पडल्याचे आत्ताच्या पेपरफुटीवरून दिसत नाही.
महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पेपर फुटीचे अनेक प्रकार झाले पण त्यावर कठोर कारवाई झाली नाही उलट चुकीच्या बातम्या दिल्या जातात, त्यांच्यावरच कारवाई करू असे उद्धट विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. २ मे २०२६ रोजी झालेल्या एसआरपीएफ दौंड शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे विचारण्यात आले होते, हा सुद्धा स्पर्धा परिक्षेतील गैरप्रकारच आहे. भाजपा सरकारला परिक्षाही घेता नाहीत हे अकार्यक्षम सरकारचे लक्षण असल्याची टीका त्यांनी केली. (Arrest Abhishek Singh in connection with the NEET paper leak case)