नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए सरकारचा पाठिंबा काढून घेऊ नये, यासाठी केंद्राने संसदेत नवीन विधेयके आणल्याचा दावा शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (२० ऑगस्ट) केला. (Raut slams Nitish-Naidu)
‘एक्स’वरील पोस्टमध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील मंत्र्यांना अटक केल्यास किंवा सलग ३० दिवस कोठडीत ठेवल्यास त्यांना काढून टाकण्याची तरतूद असलेल्या नवीन विधेयकांना नितीश आणि नायडू सर्वांत जास्त घाबरले आहेत.
‘‘मोदी-शाह मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना अटक करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी संसदेत विधेयक आणतात. नायडू आणि नितीश सर्वांत जास्त घाबरलेले असल्याचे सांगितले जाते,’’ राऊत म्हणाले. (Raut slams Nitish-Naidu)
‘‘मोदी सरकारला काळजी वाटते की ते (नायडू आणि नितीश) पाठिंबा काढून घेतील!’’ असे राऊत यांनी म्हटले आहे.
शहा यांनी तीन विधेयके मांडली. विरोधकांनी त्याविरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली. तरीही ही विधेयके मांडण्यात आली. त्यानंतर राऊत यांनी ही पोस्ट केली आहे. (Raut slams Nitish-Naidu)
लोकसभेच्या अध्यक्षांनी नामांकित केलेल्या २१ सदस्यांच्या आणि राज्यसभेच्या उपसभापतींनी नामांकित केलेल्या १० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे ही विधेयके पाठवण्यात आली.
अनेक विरोधी खासदारांनी मोठी घोषणाबाजी करत विधेयकांना विरोध केला. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब केले.
या विधेयकांना विरोध करताना, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ‘‘जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक २०२५, केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि संविधान (एकशे तीसवी सुधारणा) विधेयक २०२५ यांना माझा विरोध करतो. हे अधिकारांच्या पृथक्करणाच्या तत्त्वाचे उल्लंघन करते आणि सरकार निवडण्याचे लोकांचे अधिकार कमकुवत करते.’’
काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल आणि शहा यांच्यात राजकारणातील ‘‘नैतिकता’’ या मुद्द्यावर शाब्दिक बाचाबाची झाली.
वेणुगोपाल म्हणाले, ‘‘हे विधेयक संविधानाच्या मूलभूत तत्त्वांची मोडतोड करण्यासाठी आणले आहे. भाजप सदस्य म्हणत आहेत की हे विधेयक राजकारणात नैतिकता आणण्यासाठी आहे. मी गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारू शकतो का? जेव्हा ते गुजरातचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती – त्यावेळी त्यांनी नैतिकता राखली होती का?’’
वेणुगोपाल यांना उत्तर देताना शाह म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध खोटे आरोप करण्यात आले आहेत, ‘‘मला अटक करण्यापूर्वी मी नैतिक आधारावर राजीनामा दिला होता आणि जोपर्यंत न्यायालयाने मला निर्दोष घोषित केले नाही तोपर्यंत मी कोणतेही संवैधानिक पद स्वीकारले नाही.’’