पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी : सत्तेसाठी भाजपसोबत जाणार नाही, संधीसाधू राजकारण करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार, या चर्चेला तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे. (Pawar at Pimpari)
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आज मेळावा झाला. त्या मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले, जे सोडून गेले आहेत, त्यांची चिंता करु नका. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहेत. १९७८ मध्ये अनेक आमदार मला सोडून गेले. मी त्यावेळी चिंता केली नाही. पुन्हा मीच पक्ष उभा केला. त्यामुळे कोणी सोडून गेले याची चिंता करु नका. जनता सुज्ञ आहे. लोकशाही त्यांच्यामुळेच जिवंत आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. (Pawar at Pimpari)
शरद पवार म्हणाले, गांधी नेहरू हा काँग्रेसचा विचार आहे. राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या लोकांना आपण बरोबर घेऊ. पण भाजपचा तो विचार नाही. त्यामुळे सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसण्याचा प्रश्नच नाही. संधीसाधू विचाराच राजकारण करणार नाही. तुम्ही निवडणूकीची काळजी करु नका. इथे आपण सगळ्या जागा लढवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Pawar at Pimpari)
यशवंतराव चव्हाण यांच्या दुरदृष्टीमुळे या उदयोगनिर्मितीची झाली असे सांगून शरद पवार म्हणाले, भूमीपुत्रांनी जमिनी दिल्या. संपूर्ण राज्यातून लोक रोजगारातून आले. कष्टकऱ्यांच्या घामातून हे शहर उभे राहिले आहे. आज शहरात २४ तास पाणी ही लोकांची मागणी आहे. अनधिकृत बांधकाम कायम करणे हा प्रश्न मोठा आहे. शहरातील रेडझोनचा प्रश्न देखील गंभीर आहे. त्यात लक्ष घालण्याची गरज आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्या पूर्णपणे फेसाळलेल्या आहेत. या दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर हे प्रश्न सोडवायचे असतील तर एका विचारांनी काम करणारे संघटनाची अत्यंत आवश्यकता आहे. हे संघटन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो. (Pawar at Pimpari)