कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यात बकरी ईद आणि उरुसासाठी प्राण्यांच्या कुर्बानीला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाने परवानगी देण्यासाठी काही अटी घातल्या असून या अटींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे. (Kurbani)
बकरी ईद शनिवारी ७ जून रोजी असून त्यानंतर ८ ते १२ जून या कालावधीत विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यात चार दिवस उरुस आहे. ईद आणि उरुसासाठी न्यायालयाने कुर्बानीला परवानगी दिली आहे. हा आदेश नीला गोखले आणि फिरदोश पुनीवाला यांच्या सुट्टीतील खंडपीठाने दिला आहे. विशाळगडावरील हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टने ईद आणि उरुसासाठी प्राण्यांची कुर्बानी देण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यावर आज सुनावणी झाल्याने न्यायालयाने प्राण्यांच्या कुर्बानीला परवानगी दिली आहे. (Kurbani)
अधिकाऱ्यांनी असा दावा केला होता की, सरंक्षित स्मारकात प्राण्यांची कत्तल होत होती. महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियम, १९६२ नुसार किल्ल्याच्या परिसरात अन्न शिजवण्यास आणि सेवन करण्यास मनाई केली आहे. याचिकर्त्यांकडून ट्रस्टचे वकील सतीश तळेकर आणि माधवी अय्यपन यानी असा युक्तीवाद केला की, किल्ल्याच्या परिसरात असलेला दर्गा हा ११ व्या शतकात बांधलेला आहे असून ते ऐतिहासिक स्मारक आहे. या दर्ग्याला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचे भाविक येतात. ट्रस्टने अशी माहिती दिली की दर्ग्यावरील प्राण्यांची कुर्बानी ही एक प्रथा असली तरी प्रत्यक्ष कुर्बानी सार्वजनिक ठिकाणी होत नसून किल्ल्यापासून सुमारे दीड किलो मीटर अंतरावरील खासगी जागेत बंद जागेत केली जाते. वकिलांनी असा युक्तीवाद केला की कुर्बानी दिलेल्या प्राण्यांचे मास दर्ग्यावरील यात्रेकरु, भाविक आणि इतरांना प्रसाद म्हणून दिले जाते. तसेच हा प्रसाद किल्ल्याच्या आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या अनेक गरीब लोकांचे अन्न आहे. (Kurbani)