मुंबई : प्रतिनिधी : कोरेगाव व्यवहार रद्द झाल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. या व्यवहारात एक पैशाचाही व्यवहार झालेला नाही, असा दावाही त्यांनी केला. तरीही या प्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली असून एक महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (Koregaon land transaction cancelled)
उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल होते. त्यानंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. मी आजपर्यंतच्या राजकीय जीवनात नियम तोडून काम केलेलं नाही२००९ मध्येही माझ्यावर आरोप झाले, पण ते सिद्ध झाले नाहीत. कारण त्या आरोपात अनियमितता होती. तसेच श्वेतपत्रिका काढली हे आपल्याला ज्ञात आहे. तरीही अधूनमधून कमेंटस करून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, कोरेगाव जमीन व्यवहारात मला अजिबात काही माहिती नव्हती. मला माहिती असती तर लगेच सांगितलं असते. पण साहजिकच विरोधक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामध्ये दुमत नाही. मात्र, मला आजच माहिती मिळाली की, याप्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. पुढील एक महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (Koregaon land transaction cancelled)
कोरेगाव जमीन व्यवहारावर बोलताना अजित पवार म्हणाले की, या व्यवहारात चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे ठरवले. पण ते नागपूरला होते. त्यामुळे मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यांना मी सांगितले की, जरी माझ्या घरातल्या जवळच्यांचा विषय असला, तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. त्यामुळे तुम्हाला जे काही नियमाप्रमाणं करावे लागेल, चौकशी करावी लागेल, समिती नेमायची असेल ते करा, माझा त्या गोष्टीला पाठिंबा राहील. आरोपातील वस्तूस्थिती जनतेला कळणं आवश्यक असते. कारण या व्यवहारात एक रुपया देखील दिला गेलेला नाही. मोठे आकडे सांगितले गेले, गोष्टी सांगितल्या गेल्या, परंतु मला आज जे कळालं, जो काही व्यवहार झाला होता तो रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. (Koregaon land transaction cancelled)
1 comment
Comments are closed.
Add Comment