मुंबई : प्रतिनिधी : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १२० पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅंम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून पर्यटकांना शोधण्यासाठी आणि महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली. संपर्क होत नसल्याले पर्यटक ठाणे जिल्ह्यातील पाच सोलापूर जिल्ह्यातील चार, अहिल्यानगरमधील एक, नाशिक जिल्हयातील चार, मालेगावमधील तीन, चारकोप कांदिवली मधील सहा , मुंबई उपनगर सहा आणि टिटवाळ्यातील दोन पर्यटकांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे राज्य आपत्कालीन कक्ष सतत उत्तराखंड आपत्ती कक्षाच्या सतत संपर्कात असून बचाव कार्यासाठी आवश्यक समन्वय, माहिती अद्ययावत करणे आणि संबंधित कुटुंबियांना मदत पुरविण्यासाठी कार्यरत आहे. (Efforts to contact 31 tourists)
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्य आपत्ती कक्षातून उत्तराखंडमधील पर्यटकांबाबत आढावा घेतला. बैठकीला मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापनच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
राज्याचे आपत्ती नियंत्रण कक्ष राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र, उत्तराखंडच्या आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष, उत्तरकाशी यांच्याशी सातत्याने संपर्कात असून महाराष्ट्रातील पर्यटकांच्या नातेवाईकांनी काळजी करू नये, असे राजेश कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पर्यटकांना रेल्वे किंवा विमानाने आणण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत बचाव कार्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आज सर्व पर्यटकांना हेलीकॉप्टरच्या मदतीने हर्षील हेलीपॅड येथून गंगोत्री येथे बस, इतर वाहने, पायी आणण्यात येणार आहे. गंगोत्री ते हर्षील हेलीपॅडदरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी १० आयटीबीपी टीम सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीम ३० यात्रेकरुंना संरक्षण देणार आहे. शिवाय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद केंद्र, राज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र आणि स्थानिक बचाव पथक धराली येथे कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (Efforts to contact 31 tourists)
ढगाळ हवामानामुळे संपर्क यंत्रणा व रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. संपर्क व रस्ते पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय आपत्कालिन प्रतिसाद केंद्र नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून अडकलेल्या पर्यटकांचे स्थलांतर अपेक्षित आहे. उत्तराखंडमध्ये आपत्ती बचाव कार्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरूप यांच्याद्वारे उपग्रह फोन सुरू करण्यात आले आहेत. पर्यटकांचे शेवटचे ठिकाण (लोकेशन) जाणून घेण्यासाठी दूरसंचार विभागाची मदत घेवून पर्यटकांचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिल्याचे श्रीमती सेठी यांनी सांगितले. (Efforts to contact 31 tourists)
महाराष्ट्र संपर्क क्रमांक – राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र संपर्क: 93215 87143/ 022-22027990/022-22794229, डॉ. भालचंद्र चव्हाण, संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र महाराष्ट्र -9404695356. उत्तराखंड राज्य आपत्कालीन कार्य केंद्र संपर्क 0135-2710334/8218867005, प्रशांत आर्य, जिल्हाधिकारी, उत्तरकाशी- मोबाईल क्रमांक: 9412077500/ 8477953500, मेहेरबान सिंग (भाप्रसे) (समन्वय अधिकारी)- 9412925666, श्रीमती मुक्ता मिश्रा, सहायक जिल्हाधिकारी, उत्तरकाशी- 7579474740, जय पनवार, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उत्तराखंड- 9456326641, सचिन कुरवे (भाप्रसे) (समन्वय अधिकारी) – 8445632319.