मुंबई : प्रतिनिधी : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये” असे वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असे छातीठोकपणे सांगितले जात होते. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.
रयत शिक्षण संस्थासह अनेक संस्थामधील बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत. दोघांमध्ये संवादही होत आहे. नुकत्याच झालेल्या सहकार परिषदेतही पवार काका पुतणे एकत्र आले होते. त्यातच काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये’ असे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती.
या संदर्भात आज राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणाची सध्या चर्चा नाही. विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे चर्चेचा विषय नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी गळती लागण्याची शक्यता असल्याने या चर्चा होत आहेत. आगामी काळातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने ते (शरद पवार) अशा प्रकारचे वक्तव्य करत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.