बीड : मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेनंततर यातील सूत्रधार वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीला अटक करण्यात आली. या थरारक घटनेचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर बीडचा बिहार होत असल्याची स्पष्ट दिसत होते. आता तशी आणखी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. तेथील एका सरपंच आणि त्याच्या समर्थकांचा मुजोरपणा इतका खालच्या थराला गेला आहे की सरपंचाने आणि त्याच्या समर्थकांनी वकील महिलेला जबर मारहाण केली आहे. त्यांनी केलेल्या या मारहाणीत महिलेची पाठ अक्षरश: सोलून निघाली आहे. पाठीवर काळे निळे व्रण उठले आहेत. (Woman Lawyer assaulted)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित महिलेल्या झालेल्या जबर मारहाणीचे फोटो ‘एक्स’वर शेअर केले. ते फोटो पाहताना अंगाचा थरकाप उडतो. ज्ञानेश्वरी अंजान असे या वकील महिलेचे नाव आहे. या महिलेल्या झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी सरपंचांसह दहा जणांवर युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच अनंत रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडू मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Woman Lawyer assaulted)
मारहाणीचे कारण काय?
अंबाजोगाई तालुक्यातील सनगावच्या वकील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांनी ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत आहे. त्यामुळे लाऊड स्पीकर लावू नयेत, घरापुढच्या पिठाच्या गिरण्या काढाव्यात, अशी मागणी केली होती. त्यासंबंधी तक्रारीही केल्या आहेत. ज्ञानेश्वरी यांची आईची कोर्टात सुरू असलेली एक केस काढून घेण्यावरुनही वाद होत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी संबधित महिलेला शेतात अडवले. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र काठ्या आणि पाईपसह आलेल्या सरपंच आणि त्याच्या समर्थकांनी तिला बेदम मारहाण केली. इतकी बेदम मारहाण केली की त्यात ही महिला बेशुद्ध पडली. नातेवाईकांना ही घटना समजताच ते घटनास्थळी धावले. त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. तिची पाठ काळीनिळी पडली आहे. उपचारानंतर या महिलेला डिसचार्ज मिळाला आहे. (Woman Lawyer assaulted)
संतप्त पडसाद
दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, बीडमध्ये अजित पवारांचा दरारा राहिलेला नाही, अशी टीका महिला कार्यकर्त्या ॲड. तृप्ती देसाई यांनी केली आहे. बीडमध्ये अजित पवारांचा दरारा राहिलेला नाही, ना तिथले लोक पोलिसांना घाबरतात, मग बीडमध्ये नेमके काय करायला हवे? या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या आरोपींना अटक करून अशा प्रवृत्तीचे मूळ बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे, अशी मागणीही देसाई यांनी केली.
गावात या सरपंचाचा कारभार कसा असेल?
शरद पवार गटाचे नेते ॲड. जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण करण्यात आली. महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लावू नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. म्हणून तिला मारहाण करण्यात आली. महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातूनही एका रात्रीत उपचार करून तिला घरी पाठवले आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील महिलेला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.
हेही वाचा :
पाहुणा बनून मंगलकार्यालयात चोरी करायचा