Uddhav on Maratha protest: मराठा आंदोलकांशी थेट चर्चा करा : उद्धव ठाकरे

Uddav Thackeray

मुंबई : मराठा आंदोलक शुक्रवारी (२९ ऑगस्ट) मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले. सीएसटीचा सर्व परिसर भगवा झाला आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला खडेबोल सुनावले. (Uddhav on Maratha protest)

इतरांना भूमिका विचारत बसण्यापेक्षा मराठा आंदोलकांशी थेट चर्चा करा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

जबाबदारी सरकारची

अंतरवाली सराटी भेटीचा संदर्भ देऊन ठाकरे म्हणाले, ‘‘माझे म्हणणे मी तेव्हाच मांडले आहे. मी अंतरवाली सराटीमध्ये गेलो होतो, तेव्हा मराठा आरक्षणाच्या विषयावर मनोज जरांगेंच्या समोर उभे राहून बोललो होतो. आता त्यांनी (सरकारने) हा प्रश्न हाताळला पाहिजे. त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. दहा जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही आणि आंदोलक थेट बोला.’’(Uddhav on Maratha protest)

ते म्हणाले, ‘‘ही संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. ज्यांनी ज्यांनी आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ते लोक आता कुठे आहेत? ते आता गावी पळाले आहेत. आता नुसती दर्शनं घेत आहेत. जनता जनार्दन एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत आला आहे. त्यांना सामोरे जा. नुसतं घरोघरी काय फिरत आहात?’’, असा टोलाही ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लावला.(Uddhav on Maratha protest)

शिंदेंनी जरांगेंनाच फसवले

जरांगेंनी कुणाचे कौतुक करावे हा शेवटी त्यांचा विषय आहे, असे उद्धव ठाकरे एका प्रश्नावर म्हणाले. ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावेळी ते म्हणाले, जरांगे यांना कुणाकडून काही अनुभव आले असतील, त्यानुसार ते बोलत असतील. शिंदे यांनीही जरांगे यांना फसवलंच आहे. ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, आता वर्षभर उपमुख्यमंत्री आहेत. का त्यांना न्याय देऊ शकत नाही? असा सवालही ठाकरे यांनी केला.

आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं आहे. ते आपले न्याय्य हक्क मागायला मुंबईत आले आहेत. सरकार न्याय देऊ शकत नाही, असे त्यांना वाटत असेल तर विघ्नहर्त्याकडेच प्रार्थना करावी लागेल, असे ठाकरे म्हणाले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर