मुंबई : विशेष प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (२४ मे) भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. त्याचवेळी या तिघांची नावे देशाच्या इतिहासातून पुसली जातील, मात्र ठाकरे आणि पवार हे ब्रँड कायम राहतील, असे ते म्हणाले. (Sanjay Raut criticizes Modi)
मुंबई जिंकायची आणि अमित शहा यांच्यासारख्या व्यापाऱ्यांच्या पायाशी टाकायची, हे यांचे धोरण आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी फडणवीस यांच्यावर केला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीवेळी ठाकरे पवार हे ब्रँड संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, ते संपणार नाहीत, असे विधान केले. राज यांच्या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. (Sanjay Raut criticizes Modi)
मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकण्यासाठी उद्धव ठाकरे तयार आहेत. ती त्यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘ठाकरे ब्रँड कधी संपणार नाही. ईस्ट इंडिया कंपनी सुरतचे मालक म्हणताय की, जोपर्यंत पवार आणि ठाकरे ब्रँड संपत नाही तोपर्यंत मुंबई आपल्याकडे घेता येणार नाही. या देशातून मोदी, फडणवीस, शहा ही नावे पुसली जातील. कारण त्यांनी देशासाठी काहीच केले नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भरीव काम केले आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे ब्रँडच राहतील.’’
मराठी माणसासाठी एकत्र यावे लागेल
मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. त्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. आपण मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे राऊत म्हणाले. मराठी माणसासाठी एकत्र येणे हीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मानवंदना ठरेल, असेही राऊत म्हणाले.
मुंबई जिंकण्यासाठी पैशांचा खेळ
मुंबई आणि महाराष्ट्र गिळायचे, ईस्ट इंडिया कंपनी सूरत यांचे मनसुबे मराठी माणूस पूर्ण हेऊ देणार नाही, असेही राऊत यांनी भाजपला सुनावले. आता मुंबई निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचा निधी आणि पैशांचा खेळ सुरू आहे. मात्र, त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला. (Sanjay Rait criticizes Modi) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले महापालिका निवडणुकीचे संकेत म्हणजे धमकी आहे. याआधी त्यांनी लोकसभा, विधानसभेला धमक्या दिल्या, आता महापालिकेसाठी देत आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीसाठी देतील. ते निधी, धमक्या, खंडण्या यामुळे निवडणुका जिंकत आहेत. फडणवीस, मोदी, शहा कंपनी निवडणुका कशा जिंकतात, ते जनतेला माहिती आहेत. ते सर्व ईस्ट इंडिया कंपनीचे पार्टनर आहेत. त्यांचे हेडक्वॉटर सुरतमध्ये आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा :
काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा पहेलगाम हल्ल्यावर बोला
धुळ्याचा खजिना अनिल गोटेंनी रोखला