मुंबई : विशेष प्रतिनिधी : हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने ५ जुलै रोजी एकत्रित मोर्चा काढायचा निर्णय घेतला आहे. मात्र राज आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघूच देणार नाही, असे आव्हान ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिले आहे. सदावर्ते यांच्या या भूमिकेवर ठाकरे गटानेही संतप्त प्रतिक्रीया दिली असून, मोर्चा रोखणाऱ्या सदावर्तेंना मराठी माणूस चोपून काढेल, असा इशारा दिला आहे. (Sadawarte challenges Raj)
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत त्रिभाषा सूत्राचा वापर करण्याला, पर्यायाने हिंदी सक्तीला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. तरीही शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतलेला नाही. आडमार्गाने पहिलीपासून हिंदी लादण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याला राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला. गुरुवारी (२७ जून) त्यांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भेट घेऊन शासनाची भूमिका स्पष्ट केली, तथापि त्याने समाधान न झाल्याने राज ठाकरे यांनी मुंबईत सहा जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. शुक्रवारी ठाकरे गटाशी चर्चा झाल्यानंतर मोर्चाची तारीख बदलून ती ५ जुलै अशी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर ‘‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही,’’ असे आव्हान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिले आहे. राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केल्यापासूनच सदावर्तेंनी मोर्चाला विरोध दर्शवला होता. (Sadawarte challenges Raj)
‘‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा निघू देणार नाही. जे नियम सर्वसामान्यांना आहेत, तेच नियम यांनाही लागू असले पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटतात, यावर मला बोलायचे नाही. पण, ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे बाळगोपाळाचा मोर्चा आहे, हिंदी रोखणे म्हणजे मुलांच्या शिक्षणासोबत खेळण्यासारखे आहे’’, असेही सदावर्तेंनी म्हटले आहे. (Sadawarte challenges Raj)
सदावर्ते यांनी मुंबई पालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
सदावर्तेंना मराठी माणूस जाम चोपेल : अविनाश जाधवांचा संताप
दरम्यान, मोर्चाला सदावर्तेंनी आव्हान दिल्यानंतर ठाकरे गटाने संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. या मोर्चाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंना मराठी माणूस चोपेल असा इशारा दिला आहे. हिंदीसक्तीविरोधातील मोर्चाबाबत शिवसेनेचे (ठाकरे) नेते अविनाश जाधव म्हणाले, “५ जुलैचा मोर्चा ‘न भुतो नव भविष्यती,’ असा असेल.” “आमची भाजपाला विनंती आहे की त्यांनी सदावर्तेच्या तोंडावर पट्टी बसवावी. अन्यथा मराठी माणूस त्याला जाम चोपेल,” असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.