सांगली : सरकारने मंजूर केलेला गोहत्या बंदी हा गोहत्या बंदी कायदा नव्हे ; तर तो गोपालक हत्या कायदा बनला आहे. आज शेतकऱ्यांसमोर भाकड गाई, कमी दूध देणाऱ्या म्हशी आणि गाई, अशा जर्सी गाई, होस्टन गाईंचे नेमके करायचे काय?, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. यातच भाकड जनावर विकायचे म्हटले की रस्तोरस्ती अडवणूक करून खंडण्या गोळ्या करत आहेत. अशा खंडणीबहाद्दर गोरक्षकांचा बंदोबस्त नांगराचा फाळ घेऊन करू, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला. (Sadabhau Khot warns cow vigilantes)
दोन गाई दुधाळ असल्या आणि त्यात एक गाय जर भाकड निघाली तर ती शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही, असे सांगून सदाभाऊ खोत म्हणाले, जर्सी गायीला आणि म्हशीला गोऱ्या झाला तर तो औतालाही चालत नाही आणि बाजारातही त्याला विकता येत नाही. म्हणून शेतकरी एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा उभा करत आहे. त्याच्यावर पुन्हा अनुत्पादक जनावर भार म्हणून पडलं तर तो धंदा निश्चितपणानं तोट्याचा होत आहे. (Sadabhau Khot warns cow vigilantes)
भाकड जनावर बाहेर विकायचं म्हटलं तर हे गोरक्षक रस्तोरस्ती आडवत आहेत. खंडणीबहाद्दर म्हणून खंडण्या गोळा करत आहेत. याचा फटका निश्चितपणानं गावगाड्यातील शेतकऱ्याला बसत आहे. पूर्वी भाकड जनावराला २५-३० हजार रुपये मिळायचे, त्यात २०-२५ हजार घातले की नवीन जनावर घेता यायचं. परंतु, आता या गोरक्षकांच्या गोरखधंद्यामुळे आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडले आहेत. हे गोरक्षक आता गोभक्षक झाले आहेत आणि म्हणून आता लढा दिल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही, असे ते म्हणाले.
आता आम्ही नांगराचा फाळ हातामध्ये घेऊन या गोरक्षकांचा आता बंदोबस्त करणार आहोत. कारण आता ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे शेतकऱ्यांच्या घामाची आहे. म्हणून आता या गोरक्षक नव्हे तर गोरखधंदा करणाऱ्या गोभक्षकांशी नांगराचा फाळ हातात घेऊन लढू, असा सणसणीत इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.