मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा भाजपाचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Ram Naik)
जानेवारीपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाईक तीन वेळा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता प्रकृति स्थिर असली, तरी संपूर्ण विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला असल्याने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. नाईक यांचा मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव व समितीपुढे आलेल्या सूचना यामुळे मुख्यत्वे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे ही काळाची गरज असल्याचे नाईक यांचे मत झाले होते. योगायोगाने समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच गेल्या महिन्यात सरकारने हा निर्णय घेतला. त्यामुळे महत्त्वाचे काम झालेच आहे, धोरण निश्चिती संदर्भातील अन्य कामांना अधिक विलंब नको या हेतूने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा पत्रात राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नीतेश राणे यांचे आभार मानले आहेत. (Ram Naik)