श्रीनगर : भारत देश यापुढे अण्वस्त्रांचे ब्लॅकमेल सहन करणार नाही. भारत यापुढे दहशतवादाला निर्णायक शक्तीने प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानने अनेकवेळा भारताला अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत हे जगाने पाहिले आहे. पाकिस्तानच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित आहेत का हा माझा जगाला प्रश्न आहे. पाकिस्तानची अण्वस्त्रे आतंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेच्या (आयएईए) देखरेखीखाली ताब्यात घेतली पाहिजेत अशी मागणीही केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्रीनगर येथे सैनिकांच्या तळांना भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. सैनिकासमोर बोलताना राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील दहशतवादांची सर्वात मोठी कारवाई आहे, असे सांगून यापुढे दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करुन भारताच्या कपाळावर दुखापत करण्याचा आणि देशाची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी भारताच्या कपाळावर हल्ला केला पण आम्ही त्यांच्या छातीवर जखमा केल्या आहेत असेही ते म्हणाला. पाकिस्तानच्या जखम भरुन काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भारतविरोधी व दहशतवादी संघटनांना आश्रय देणे थांबणे आणि त्याची भूमी भारताविरोधात वापरण्याची परवानगी देऊ नये.
पाकिस्तान जिथे उभा राहतो तिथून भिकाऱ्यांची रांग उभी राहते
राजनाथ सिंह म्हणाले, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कर्ज मागण्यासाठी गेला होता. आपला भारत देश अशा देशांच्या श्रेणीत येतो की जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कर्ज देतो की जेणेकरुन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी गरीब देशांना कर्ज देऊ शकेल. अशा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे वारंवार कर्ज मागण्याच्या स्थितीत पाकिस्तान पोचला आहे. त्यामुळे जिथे पाकिस्तान उभा असतो तिथून भिकाऱ्याची रांग सुरू होते, अशा शब्दात भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खिल्ली उडविली.