नवी दिल्ली : प्रतिनिधी : ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी मारले गेले आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंगळवारी रात्री दीड वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त केले. लष्कराच्या या कारवाईचे सर्वच विरोधी पक्षांनी स्वागत करत त्यांचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूर माहिती देण्यासाठी आज गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. तसेच सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सूचना दिल्या. तसेच ऑपरेशन यशस्वी राबवल्याबद्दल सशस्त्र दलाचे कौतुक करत अभिनंदन केले. दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकार आणि सैन्य दलाला पाठिंबा दिला आहे, असे संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले.
बैठकीनंतर पीटीआयशी बोलताना राहूल गांधी म्हणाले, आम्ही सैन्य दलाच्या कारवाईला पूर्ण पाठिंबा दिला आहे. काही गोष्टी आहेत त्यावर चर्चा करु नये असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले ते बरोबर आहे. सर्वांनी पाठिंबा दिला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, बैठकीत आम्ही केंद्राचे म्हणणे ऐकले. त्यांनी असे म्हटले आहे की काही गोपनीय माहिती बाहेर शेअर केली जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना सांगितले की आम्ही सर्वजण सरकारसोबत आहोत.
टीआरएफ या दहशतवादी संघटनेच्या विरोधात जागतिक मोहिम राबवावी अशी सूचना केल्याचे एआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.