नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (३ जुलै) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मृत्यूंवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत असतानाही, त्यांच्या दुर्दशेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे मरण सुरू आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. (Rahul slams government)
राहुल गांधी यांनी हिंदीमध्ये ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. कर्जमाफी आणि पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची (MSP) कायदेशीर हमी देण्याच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला.
बुधवारी (२ जुलै) राज्यातील शेतकऱ्यांच्या मृत्यू आणि सोयाबीन उत्पादकांना थकबाकी न देण्याच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभेतून दोनदा सभात्याग केला. (Rahul slams government)
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत, या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०० प्रकरणे मदतीसाठी अपात्र घोषित करण्यात आली आहेत, तर १९४ प्रकरणांमध्ये चौकशी प्रलंबित आहे, असे सांगितले.
त्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी ही पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘विचार करा… फक्त ३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही फक्त एक आकडेवारी आहे का? तर नाही. ही ७६७ घरे उद्ध्वस्त झाली आहेत. ७६७ कुटुंबांची ही हानी कधीही भरून येणार नाही. आणि सरकार? ते गप्प आहे. ते दुर्लक्ष करीत आहे.’’ (Rahul slams government)
बियाणे, खते आणि डिझेल महाग असल्याने शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. ‘‘पण किमान आधारभूत आधारभूत किमतीची हमी नाही. शेतकरी जेव्हा कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते,’’ असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
‘‘ज्यांच्याकडे करोडो आहेत त्यांचे काय? मोदी सरकार त्यांचे कर्ज सहज माफ करते. आजच्या बातम्या पहा – अनिल अंबानींनी ४८,००० कोटी रुपये घेतले. त्यांच्या कंपनीचे खाते एसबीआय ‘फ्रॉड,’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदीजी म्हणाले होते की ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतील. आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांचे आयुष्य अर्धे होत चालले आहे,’’ असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
ही व्यवस्था शेतकऱ्यांना मारत आहे. मोदी मात्र स्वत:तच मश्गुल आहेत, अशी टीकाही गांधी यांनी केली. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ‘एक्स’ वर एक चार्ट शेअर करत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात ५५,९२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला.
हेही वाचा :
राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागावी : संजय राऊत
दलाई लामा हेच उत्तराधिकारी ठरवू शकतात : रिजिजू