राहुल गांधीः भारतीय राजकारणातला निर्मळ प्रवाह

  • विजय चोरमारे

मी राहुल गांधी यांच्या राजकारणाचं फार बारकाईनं अवलोकन करतोय. तीसेक वर्षांपासून करतोय. वारंवार वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांच्यासंदर्भात लिहित आलोय. त्यात राहुल गांधींच्या प्रशंसकाऐवजी त्यांचा टीकाकार म्हणूनच अधिक भूमिका बजावलीय. हे रसायन वेगळं आहे हे लक्षात येत होतं. (Rahul Gandhi Life Journey)

अण्णा हजारेंचं आंदोलन टिपेला पोहोचलं होतं आणि दुसरे गांधी म्हणून त्यांच्या प्रचारकांनी त्यांचे ढोल वाजवायला सुरुवात केली होती. राहुल गांधींचा नालायकपणा सिद्ध करण्यासाठी सोशल मीडिया जीवाचं रान करीत होता. त्यावेळी २०११ साली चित्रलेखाच्या दिवाळी अंकात मी एक लेख लिहिला होता. त्याचं शीर्षक होतं – ‘दुसरा गांधी कोण? अण्णा की राहुल?’ अण्णा हजारे हे बोगस गृहस्थ आहेत आणि दुसरा गांधी होण्याची क्षमता राहुलमध्येच आहे, अशी मांडणी मी त्या लेखात केली होती. त्यावेळी अनेकांनी मला वेड्यात काढलं होतं आणि मी माझ्या म्हणण्यावर ठाम होतो.

मध्ये पंधरा वर्षांचा काळ गेलाय. अण्णा हजारे आणि राहुल गांधी दोघेही आपल्यासमोर आहेत.

चुकांची भलीमोठी यादी

राहुल गांधी यांच्या आयुष्यातील चुकांची यादी भलीमोठी होईल. परंतु त्यातल्या महत्त्वाच्या चुका कोणत्या?

त्यांनी युपीए-२ मध्ये मंत्रिपदाची जबाबदारी आणि शक्य असताना एका विशिष्ट टप्प्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारीही  स्वीकारली नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन परागंदा झाले.

आणि एकूण राजकारणातील सातत्याचा अभाव. तोही अशा काळात जेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे बारा महिने चोवीस तास राजकारण करीत असताना. (Rahul Gandhi Life Journey)

या सगळ्या गोष्टी गृहित धरून किंवा त्या मागे टाकूनसुद्धा बघितले तर करोनामुळे उदभवलेली परिस्थिती आणि निर्माण झालेली आव्हाने याचे नीट आकलन करून घेणारे काही मोजके नेते आहेत, त्यामध्ये राहुल गांधी येतात. एकीकडे पंतप्रधान मोदी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचा भंपक कार्यक्रम देत असताना राहुल गांधी यांनी रघुराम राजन, अभिजित बॅनर्जी, राजीव बजाज यांच्याशी केलेल्या चर्चेतून करोनाकाळातील आव्हानांची देशाला जाणीव करून दिली.

त्याहीआधी फेब्रुवारीपासून राहुल गांधी सरकारला करोनाच्या गांभीर्याची जाणीव करून देत होते. राज्यकर्ते मात्र ट्रम्पचे स्वागत, दिल्लीची दंगल, मध्यप्रदेशचे सत्तांतर यात व्यग्र राहिले आणि करोना फोफावायला पुरेशी संधी दिली. चीनच्या प्रश्नावरून राहुल गांधी सरकारला नेमके प्रश्न विचारत राहिले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी रविशंकर प्रसाद यांच्यासारखे नेते वैफल्यग्रस्त होऊन भलतेच बोलत सुटले.

बदनामीची मोहीम

राहुल गांधी ५६ वर्षांचे होत आहेत. देशात सर्वाधिक ट्रोल झालेले ते नेते आहेत. हे ट्रोलिंग आजचे नाही. भाजप आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या ज्या छोट्या-मोठ्या संघटना आहेत त्यांच्यामार्फत राहुल गांधी यांची बदनामी हा एककलमी कार्यक्रम एक दशकाहून अधिक काळ राबवला गेला. विचलित न होता ते धीरोदात्तपणे चालले असल्याचे दिसते. (Rahul Gandhi Life Journey)

मनात आणले असते तर बारा वर्षांपूर्वीच ते पंतप्रधानपदावर विराजमान होऊ शकले असते. परंतु ते नाकारून देश समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तेही अगदी महात्मा गांधीजींच्या मार्गाने. राजकारणातली संवेदनशीलता नष्ट होत असताना एखाद्या तरुणाने एवढ्या संवेदनशीलतेने वाटचाल करणे हेच मुळी आश्चर्यचकित करणारे आहे. या त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक होण्याऐवजी हेटाळणी आणि टिंगलटवाळीच केली केली.

महात्मा गांधीजींनी देश समजून घेण्यासाठी काय केलं होतं ? गुरू गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात येण्याआधी देशभर भ्रमण केलं. तेही बहुतांश रेल्वेनं आणि तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून. लोकांशी थेट संपर्काचा तेवढा चांगला मार्ग दुसरा कुठलाही नव्हता. त्यानंतर नव्वद वर्षांनंतर राहुल गांधी नावाच्या तरुणानं तोच मार्ग अवलंबला. लोकांमध्ये थेट मिसळण्याचा. लोकांशी बोलण्याचा. तेही सतत मृत्युची टांगती तलवार असताना. त्यांची प्रत्येक कृती महात्मा गांधीजींच्या जवळ जाणारी आहे. कुणाला ते नाटक वाटत असेल, ढोंग वाटत असेल, परंत हे जे काही नाटक, ढोंग म्हटलं जातं ते त्या कृतीचं वर्णन असतं, जी कृती असते ती राहुल गांधींनी प्रत्यक्षात केलेली असते.

धक्के देणारा राजकीय प्रवास (Rahul Gandhi Life Journey)

राहुल गांधींचा राजकीय प्रवास दोन दशकांहून थोडासा अधिक आहे, परंतु तोही रुढ काँग्रेस मानसिकतेला अनेक धक्के देणारा आहे. २००३ मध्ये राहुल गांधी राष्ट्रीय राजकारणात येतील, असा अंदाज प्रसारमाध्यमे व्यक्त करीत होती, परंतु राहुल यांनी त्यासंदर्भातील बातम्यांना त्यावेळी कधीच दुजोरा दिला नाही.

दरम्यानच्या काळात ते सोनिया गांधी यांच्याबरोबर सार्वजनिक समारंभांतून तसेच काँग्रेसच्या काही बैठकांमधून दिसत होते. एकदिवसीय क्रिकेट मालिका पाहण्यासाठी बहीण प्रियांकासोबत ते पाकिस्तानला गेले तेव्हाही अनेकांनी त्यांना पाहिलं होतं. २००४ मध्ये जेव्हा त्यांनी प्रियांकासोबत अमेठीचा दौरा केला, त्यावेळी त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला. त्यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांच्या प्रगल्भतेची चुणूक दाखवणारी होती. राहुल म्हणाले होते, ‘मी राजकारणाच्या विरोधात नाही. परंतु राजकारणात कधी प्रवेश करायचा यासंदर्भात मी निर्णय घेतलेला नाही आणि राजकारणात यायचे किंवा नाही, हेही अद्याप ठरवलेलं नाही.’ (Rahul Gandhi Life Journey)

 काही महिने प्रसारमाध्यमे जे अंदाज व्यक्त करीत होती, त्यासंदर्भातील अनिश्चितता मार्च २००४ मध्ये संपली. मे २००४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीतून राहुल गांधी उभे राहणार असल्याची घोषणा झाली. ही घोषणा राजकीय भाष्यकारांनाही विस्मयचकित करणारी होती. कारण प्रियांका गांधी याच काँग्रेसचे भविष्य आहेत आणि त्याच काँग्रेसला पुनरुजीवन देऊ शकतात, असा बहुतेकांचा दावा होता. अनेकांना त्यांच्यामध्ये इंदिरा गांधींचे प्रतिबिंब दिसत होते. काँग्रेसला पुनर्वैभव मिळवून देण्याची क्षमता प्रियांकामध्ये असल्याचे अनेकांचे मत होते. अशा स्थितीत प्रियांका बाहेरच होत्या आणि राहुल राजकारणाच्या आखाड्यात उतरले होते.

दहशतवादाच्या सावटात आणि पर्यायानं कडक सुरक्षा व्यवस्थेत राहणं ही गांधी घराण्याची जीवनशैली बनली होती. त्यामुळं खासगी आयुष्य नावाची गोष्टच उरली नाही. जगण्यातला मोकळेपणाही नव्हता. राहुलसारख्या तरुणाला हे जाचक वाटणं स्वाभाविक आहे. त्यातूनच अनेकदा सुरक्षारक्षकांचं कडं भेदून राहुलनी सामान्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. राहुलची ही प्रत्येक कृती जोखमीची होती. परंतु ती जोखीम पत्करली. कुणी त्याला स्टंट किंवा पब्लिसिटी स्टंट म्हणत असेल पण पब्लिसिटी स्टंटसाठी कधी कुणी जिवाची बाजी लावत नाही. आणि तेही ज्या तरुणानं आजी आणि वडिलांचा दहशतवादी हल्ल्यात झालेला मृत्यु पाहिला आहे.

युवकांशी संवादावर भर

सुरुवातीपासून राहुलनी युवकांशी संवादावर भर ठेवला. अगदी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठापासून देशभरात ठिकठिकाणी त्यानं हा संवाद साधला. देशातील युवक कशा प्रकारे विचार करताहेत, राजकारणासंदर्भात, राजकीय नेत्यांसंदर्भात त्यांच्या काय भावना आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या संवादांतूनच राजकारणाबद्दल युवकांच्या मनात असलेली परकेपणाची भावना, तिटकारा या गोष्टी लक्षात आल्या. काँग्रेस पक्षाशी संलग्न असलेल्या एनएसयुआय, युवक काँग्रेस या संघटनांमध्येही राजकीय नेत्यांच्या कुटुंबांतील तरुणांचा भरणा असल्याचे जाणवले आणि या संघटनांचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. अर्थात कितीही अधिकार असले तरी एका झटक्यात असे संघटनेतले फेरबदल करता येत नाहीत, हे राहुल गांधींना यानिमित्ताने लक्षात आले असावे.

युवकांच्या एका श्रमदान शिबिरात राहुल सहभागी झाले होते, तेव्हा त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये घमेल्यातून दगडमाती खांद्यावर वाहून नेणाऱ्या युवकांचे छायाचित्र होते. दगडमाती वाहून नेणाऱ्या त्या युवकांच्या रांगेत राहुल गांधी होते. सगळ्यांच्या खांद्यावर लोखंडी घमेले होते आणि राहुलच्या खांद्यावर प्लास्टिकचे घमेले. त्यावरून सोशल साइट्सच्या माध्यमातून राहुलची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवण्यात येत होती. का तर म्हणे प्लास्टिकचे घमेले खांद्यावर घेऊन श्रमदानाचे नाटक करतोय म्हणून. ज्याला स्वतःच्या घराबाहेर मोकळा श्वासही घेता येत नाही, असा तरुण समवयस्क तरुणांच्यात मिसळतो. जमेल तेवढे श्रमदान करतो, हे लक्षातही न घेता टिंगल करणाऱ्यांमध्ये संघपरिवाराशी संबंधित घटकांचा मोठा सहभाग होता.

म्हणजे हे ट्रोलिंग २०१४ पासून नव्हे तर त्याच्याही खूप वर्षे आधीपासून सुरू होते.  राहुल गांधींनी दलिताच्या झोपडीत मुक्काम केला, त्यांच्याबरोबर जेवण घेतले. या कृतीला केवळ स्टंटबाजी म्हटले गेले. देशाचं राजकारण खांद्यावर घेण्यासाठी सज्ज होणारा तरुण नेता राजकीय उमेदवारीच्या काळात या गोष्टी करतोय, हे लक्षात घेतले गेले नाही. तळागाळातल्या माणसांचे जगणे समजून घेण्याची प्रामाणिक कृती म्हणून त्याकडे पाहायला हवे. (Rahul Gandhi Life Journey)

रेल्वेच्या स्लीपर क्लासने प्रवास

लॉकडाऊननंतर स्थलांतरितांची होरपळ आपण पहिली. राहुल गांधींनी मजुरांशी साधलेला संवादही पहिला, ऐकला. ही पहिली वेळ नव्हती.स्थलांतरितांमुळे देशातील अनेक महानगरांमधून मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. दिल्लीतही हाच प्रश्न आहे. कोलकाताही त्याला अपवाद नाही. यासंदर्भात वृत्तवाहिन्यांमधून सतत चर्चा होत असते. वृत्तपत्रांमधूनही चर्चा सुरू असते. त्यामुळे प्रश्नाचे अनेक कंगोरे समोर येतात. (Rahul Gandhi Life Journey)

राहुल गांधी यांनी २० ऑक्टोबर २०१०ला  गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसने गोरखपूरपासून मुंबईपर्यंत स्लीपर क्लासमधून प्रवास केला. उत्तरेकडील राज्यांमधून मुंबईकडे लोक रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात, त्यांच्या स्थलांतराची कारणे काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी राहुलनी ३६ तासांचा हा प्रवास केला. या प्रवासात ते सहप्रवाशांशी, तरुण बेरोजगारांशी बोलले. त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी हा प्रवास केला. या प्रवासाची खबर ना प्रसारमाध्यमांना होती, ना पोलिसांना. या प्रवासानंतर तब्बल दहा दिवसांनंतर प्रसारमाध्यमांना असे काही घडल्याची खबर लागली. यावरून लक्षात येते की, राहुल गांधी काही गोष्टी समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होते. पब्लिसिटी स्टंटच करायचा असता तर राहुलबरोबर वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांची पलटन आली असती आणि ३६ तासांच्या दौऱ्याचे लाइव्ह कव्हरेज मिळाले असते.

शेतकरी आंदोलनात सहभाग

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचाराविरोधात त्यांनी आवाज उठवला, तेव्हा प्रसारमाध्यमांतील तज्ज्ञांनी त्यांना जैतापूरची आठवण करून दिली. पुण्याजवळ मावळच्या गोळीबाराच्या घटनेनंतरही ‘कुठे आहेत राहुल गांधी?’ असा कांगावा प्रसारमाध्यमांनी विशेषतः मराठी वृत्तवाहिन्यांनी केला. परंतु हा कांगावा करताना एक गोष्ट त्यावेळी कुणीही लक्षात घेतली नव्हती, ती म्हणजे घटना घडली तेव्हा श्रीमती सोनिया गांधी यांच्यावर विदेशात एक शस्त्रक्रिया झाली होती. आईच्या शस्त्रक्रियेवेळी मुलाने तिच्याजवळ असणे गरजेचे आहे, याचाही विचार कुणी केला नव्हता.

त्याचदरम्यान दिल्लीत अण्णा हजारे यांचे उपोषण आणि अटकेवरून महाभारत सुरू झाले होते. राहुल गांधी यांनी भारतात परत आल्यावर त्यासंदर्भात एक बैठक घेतली आणि दुसऱ्याच दिवशी मावळ गाठून गोळीबारात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या. हा दौराही त्यांनी गुप्त ठेवला होता, त्यामुळे एकाही वृत्तवाहिनीला त्यांना गाठता आले नाही. पुढची-मागची वस्तुस्थिती विचारात न घेता यावेळीही वृत्तवाहिन्यांनी ‘एवढ्या दिवसांनी राहुल गांधी मावळात उगवले’ अशा प्रकारे या दौऱ्याचे वृत्तांकन केले.

गाजलेला मुंबई दौरा

राहुल गांधींचा मुंबई दौराही असाच गाजला. या दौऱ्यातही त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये आयत्यावेळी बदल करून एटीएम मधून पैसे काढून थेट लोकलमधून प्रवास केला. तळागाळातल्या माणसांशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहुल गांधी करताहेत. भारतीय राजकारणात एवढी संवेदनशीलता अलीकडच्या काळात कोणत्याही नेत्याने दाखवलेली नाही. राहुल जे करत होते, त्यालाही पुन्हा त्यांच्यासभोवतीच्या कडेकोट सुरक्षेच्या मर्यादा होत्या.

राहुल गांधी ज्या काँग्रेस संस्कृतीत आहेत, त्या संस्कृतीत हुजरेगिरी करणाऱ्यांची मांदियाळी आहे. प्रांतोप्रांतीच्या सुभेदारांच्या सुभेदाऱ्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना त्या सुभेदा-यांचा अनुभव आला आणि त्यातूनच व्यथित होऊन त्यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या गंभीर चुकांपैकी ती एक चूक ठरली आणि त्यानंतर काँग्रेस दिशाहीन बनली. त्यानंतर भारत जोडो यात्रा हा त्यांच्या आणि काँग्रेसच्याही प्रवासातला टर्निंग पॉइंट ठरला.

विचारधारेच्या लढाईवर ठाम

निवडणुकीच्या राजकारणात राहुल गांधी यांना किती यश मिळतंय यावर त्यांच्या कारकिर्दीचं मूल्यमापन नाही करता येणार. आजच्या घडीला ते देशातील एकमेव नेते आहेत, ज्याना कळलंय की लढाई विचारधारेची आहे. आणि ती त्याच पायावर पुढं न्यावी लागेल. समोर सत्ता, संपत्ती आणि विखाराचा डोंगर असताना तो विचारांच्या बळावरच उलथून टाकता येईल हा विश्वास बाळगणे यासाठी दुर्दम्य आशावाद आणि स्वतःवर विश्वास असावा लागतो. ज्यांनी विद्वेष पेरून सत्ता मिळवली त्यांचं जगभरात हसं होताना आपण पाहतोय. त्याचवेळी राहुल गांधी यांचं वेगळेपण जगात उठून दिसतेय. ते आज जे प्रश्न उपस्थित करताहेत त्यांनी सत्तेच्या दुरुपयोगाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. प्रसारमाध्यमे आणि घटनात्मक संस्था निष्पक्ष असत्या तर आज चित्र निश्चित वेगळे असते. हे चित्र बदलण्यासाठीच्या राहुल गांधी यांच्या लढाईला शुभेच्छा !

राहुल गांधी यांच्याकडून भूतकाळात काही चुका झाल्या असल्या तरी राहुल गांधी यांच्यासारख्या प्रांजळ, निर्विष नेत्याची भारतीय राजकारणात गरज आहे. नफरत की बाजार मे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायला निघालेल्या राहुल गांधी यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Related posts

चंद्रचूडांच्या काठीने एकनाथ शिंदेंकडून लोकशाही वेठीला

….पोलिस बाजूला ठेऊन या; राऊतांचे महाजनांना आव्हान

फुटीवर शिक्कामोर्तब, फुटिरांना शिवसैनिक तुडवणार?