Nitish kumar Reddy : नितीशकुमार रेड्डी मालिकेतून बाहेर

cricket

मँचेस्टर : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू नितीशकुमार रेड्डीच्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याने तो भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे. त्याचप्रमाणे, या मालिकेत अद्याप न खेळलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही हातास टाके पडल्यामुळे चौथी कसोटी खेळू शकणार नाही. (Nitish kumar Reddy)

तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत भारत तीन सामन्यांअखेर १-२ ने पिछाडीवर आहे. मालिकेतील चौथ्या कसोटीस २३ जुलैपासून मँचेस्टर येथे सुरुवात होणार असून तत्पूर्वीच भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. रविवारी व्यायाम करताना नितीशच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असून या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी, मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामने त्याला खेळता येणार नाहीत. दरम्यान अद्याप कसोटी पदार्पणाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या अर्शदीपलाही दुखापतीमुळे आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. चौथ्या कसोटीपूर्वी सराव करताना अर्शदीपच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे, तो मँचेस्टर कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Nitish kumar Reddy)

भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज आकाशदीप हासुद्धा दुखापतीने त्रस्त असून चौथ्या कसोटीतील त्याच्या सहभागावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. या पार्श्वभूमीवर संघव्यवस्थापनाने हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंम्बोजला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे. आकाशदीप वेळेत तंदुरुस्त न झाल्यास अंशुलला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. मागील महिन्यामध्ये अंशुलने भारत अ संघातर्फे केलेल्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान प्रभावी कामगिरी केली होती. भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोएश्ट यांनी रविवारी वेगवान गोलंदाज महंमद सिराजच्या कार्यभार व्यवस्थापनाबाबत (वर्कलोड मॅनेजमेंट) भाष्य केले होते. त्यामुळे, सिराजला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्यास भारत तीन फिरकीपटूंसह खेळण्याची शक्यता असून कुलदीप यादवचा संघात समावेश होऊ शकतो. नितीशच्या जागी अष्टपैलू शार्दुल ठाकूरला खेळवण्याचा पर्यायही भारतीय संघासमोर आहे. (Nitish kumar Reddy)

दरम्यान, भारताचा नियमित यष्टिरक्षक रिषभ पंतच्या बोटांना तिसऱ्या कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरूपाची नसली, तरी त्याला यष्टिरक्षणाच्या जबाबदारीतून विश्रांती देऊन केवळ फलंदाज म्हणून खेळवण्याचा विचार संघातर्फे केला जाऊ शकतो. या परिस्थितीत ध्रुव जुरेलला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळेल. तिसऱ्या कसोटीदरम्यान, जुरेलने बदली यष्टिरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.  

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या