नवी दिल्ली : पन्नास वर्षांपूर्वी याच दिवशी संविधानाशी प्रतारणा करण्यात आली. संसदेचा आवाज दाबण्यात आला. ही घटना कोणताही भारतीय कधीही विसरणार नाही. आणीबाणी हा भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वांत काळ्या अध्यायांपैकी एक होता, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (२५ जून) व्यक्त केले. (Modi On Emergency)
आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एक्स’वर मोदी यांनी पोस्ट केल्या आहेत.
“भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वांत काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. भारतातील लोक हा दिवस संविधानाच्या हत्येचा दिवस म्हणून पाहतात. या दिवशी भारतीय संविधानातील मूल्ये पायदळी तुडवण्यात आली, मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्यात आली, अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवण्यात आले आणि अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले. त्या वेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने जणू काही लोकशाहीच बंदीस्त करून टाकली होती!’’ अशी टीकाही मोदी यांनी केली. (Modi On Emergency)
संविधानात व्यापक बदल करणारी आणि जनता पक्षाच्या सरकारने ती उलटवून टाकणारी ४२ वी घटनादुरुस्ती ही आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेस सरकारच्या धूर्त कारस्थानांचे एक उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, या काळात विशेषत: गरीब, उपेक्षित आणि दलितांना लक्ष्य करण्यात आले, त्यांच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्यात आला. आम्ही आपल्या संविधानातील तत्त्वांना बळकटी देण्याच्या आणि विकसित भारताचे आमचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्र काम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. आपण प्रगतीची नवीन उंची गाठूया आणि गरीब आणि दलितांची स्वप्ने पूर्ण करूया, असा निर्धारही मोदी यांनी व्यक्त केला. (Modi On Emergency)
आणीबाणीविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सलाम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘‘सर्व स्तरातील आणि विविध विचारसरणीच्या लोकांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी काम केले,’’ असे ते म्हणाले.
जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा मी संघाचा एक तरुण प्रचारक होतो. आणीबाणीविरोधातील चळवळीतने खूप काही शिकवले, मोठा अनुभव दिला, असे ते म्हणाले.
हेही वाचा :
ॲक्सिओम-४ मधून कॅप्टन शुभांशू शुक्लाची अवकाशात झेप
चांदीच्या ताटात जेवण, थाळीचा दर ४५०० रुपये
निवडणुका कायद्यानुसार : राहुल गांधी यांना उत्तर