नवी दिल्ली : मेघालय हनिमून हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे. हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशीची हत्येचा कट रचल्याची कबुली पत्नी सोनम रघुवंशीने दिली आहे. सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये अटक केली आहे. सोनमने पतीची हत्या करण्यासाठी तीन कॉन्ट्रॅक्ट किलर्सना सुपारी दिली होती असे तपासात पुढे आले आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (Meghalay Case)
या गुन्ह्याची माहिती अशी की, राजा आणि सोनम यांचा विवाह झाल्यानंतर ते मेघालयात हनिमूनसाठी गेले होते. पण २३ मे नंतर दोघांचा कुटुंबांशी संपर्क तुटला होता. दोघे बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर मेघालय पोलिसांनी तपास सुरू केला. २२ मे रोजी हे जोडपे मावलखिया गावात पोचले होते. एक रात्र त्यांनी होमस्टेमध्ये घालवली. दुसऱ्या दिवशी ते शेवटचे बाहेर जाताना दिसले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जोडप्याचे मोबाईन फोनचे शेवटचे लोकेशेन मावळखैत येथे सापडले. २३ मे रोजी त्यांनी स्कूटर भाड्याने गाडी घेतली आणि शिलाँग-सोहरा रस्त्यांवरील एका कॅफेमध्ये सोडून दिलेली आढळली. स्थानिक ग्रामस्थांनी ही घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात शोधमोहीम राबवली. (Meghalay Case)
२७ मे रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बेपत्ता जोडप्याला शोधण्यासाठी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर तपासाला वेग आला. दरम्यान दोन जून रोजी राजा रघूवंशी यांचा मृतदेह सापडला, पण पत्नी सोनम सापडली नाही. घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू, एक रेनकोट, महिलेचा पांढरा शर्ट, औषधाची पट्टी, मोबाईल फोनच्या एलसीडी स्क्रीनचा एक भाग आणि एक स्मार्ट वॉच मिळाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला. त्यानंतर सोनमचा शोध सुरू केला. सहा जून रोजी पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये २३ जून रोजी राजा आणि सोनम सोहराच्या सैतसोहपेन येथील मनहा हॉटेलमध्ये एक लहान सुटकेस घेऊन स्कूटरवरुन येत असल्याचे दिसून आले. तिथे त्यांना हॉटेलची खोली मिळाली नाही. (Meghalay Case)
सोनम रघुवंशी सापडली उत्तरप्रदेशातील ढाब्यावर
उत्तरप्रदेशातील वाराणशी गाझीपूर मुख्य रस्त्यांवरील काशी ढाब्याजवळ सोनम रघुवंशी आढळून आली. गाजीपूरच्या ढाब्याच्या मालकाने सांगितले की मध्यरात्री एक वाजता एक महिला त्याच्या ढाब्यावर आली. तिथे ढाबा मालकांकडे भावाला फोन करण्यासाठी त्यांच्याकडून मोबाईल मागितला. त्यावेळी ती रडत होती. मी तिला बसायला सांगितले आणि पोलिसांना फोन केला. पोलिस त्या महिलेला घेऊन गेले. पण सोनम होती हे आपल्याला माहीत नव्हते. (Meghalay Case)
मेघालय मुख्यमंत्र्याकडून पोलिसांचे अभिनंदन
देशाला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी राज्य पोलिसांचे अभिनंदन केले आहे. एक्स पोस्टवर त्यांनी म्हटले आहे की “या हत्याकांडाचा पोलिसांनी सात दिवसांत तपास करुन यश मिळवले आहे. मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली. महिलेने आत्मसमर्पण केले आहे आणि आणखी एका हल्लेखोराला पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे”.
मेघालय पोलिस खोटे बोलत आहेत
दरम्यान सोनमच्या वडिलांनी माझी मुलगी असे का करेल?, असा प्रश्न उपस्थित करुन मेघालय पोलिस खोटे बोलत आहेत असा आरोप केला. माझी मुलगी स्वत:हून गाजीपूरला पोहोचली. तिला मेघालय पोलिसांनी अटक केलेली नाही. सोनमचा भाऊ विपिननेही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. आणि तिने आत्मसमर्पणही केलेले नाही. या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत. डीजीपी म्हणत आहेत की तीच खुनी आहे. परंतु आत्तापर्यंत सोनमची योग्य चौकशीही झालेली नाही.