नवी दिल्ली : बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल सुधारणा (SIR) वर चर्चा व्हावी या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सोमवारी (४ ऑगस्ट) गोंधळ घातला. (Lok Sabha adjourned)
सभागृह शांततेत सुरू ठेवण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार केले. तथापि, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता बिहारच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी लावून धरली. तसेच या प्रश्नावरून विरोधकांनी गोंधळही घातला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (Lok Sabha adjourned)
पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून वारंवार होणाऱ्या गोंधळामुळे सभागृहात एकही विधेयक मंजूर झालेले नाही, याकडे अध्यक्षांनी विरोधी सदस्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर कामकाज तहकूब केले.
दुपारी २ वाजता सभागृह सुरू झाले तेव्हा काँग्रेससह विरोधी पक्षाचे खासदार उभे राहिले. हातात फलक घेऊन त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राज्य निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या एसआयआर कार्यक्रमावर चर्चा व्हावी अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. (Lok Sabha adjourned)
कामकाजाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या जगदंबिका पाल म्हणाले की, सोमवारी (४ ऑगस्ट २०२५) दोन प्रमुख क्रीडा विधेयके चर्चेसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहेत आणि जर विधेयकांवर चर्चा झाली नाही आणि ती मंजूर झाली नाहीत तर खेळाडूंसोबत अन्याय होईल.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही असेच मत मांडले.
दिल्लीत काँग्रेस खासदार आर. सुधा यांची सोन्याची साखळी हिसकावून नेण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे पाल यांनी सभागृहात सांगितले. विरोधकांनी घातलेल्या गोंधळातच अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सीमाशुल्कावरील वैधानिक ठराव मांडला, जो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.