खंडवा : दुर्गामूर्ती विसर्जनानंतर टॅक्टर ट्रॉली तलावात पलटून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आठ बालकांचा समावेश आहे. मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मयत झालेल्यांची वये २५ पेक्षा कमी होती. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. (Khandwa)
मध्य प्रदेशातील खंडवामध्ये दुर्गा मूर्तीचे तलावात विसर्जन करुन भावपूर्ण निरोप दिला. त्यानंतर भाविक आणि लहान मुले ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून गावी परत येत असताना लहान मुले आणि ज्येष्ठांनी गर्दीने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पाण्यात पडली. ही घटना तलावाकाठी असलेले नागरिक धावले. ज्यांना पोहता येत होते ते पोहत काठावर आले. पण ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये आठ मुले होती. (Khandwa)
गावातील प्रत्यक्षदर्शीने अशी माहिती दिली की मूर्ती विसर्जनानंतर ट्रॅक्टर चालकाला पाणी भरलेल्या ठिकाणावरुन ट्रॅक्टर नेऊ नये असा सल्ला दिला होता. पण चालकाने ज्येष्ठ लोकांचा सल्ला धुडकावल्याने अपघात घडला. बघता बघता ट्रॉली पाण्यात पलटी झाली. यावेळी जीव वाचवण्यासाठी ट्रॉलीतील ओरडत होते. नागरिक, होमगार्ड घटनास्थळी धावले. एसडीईआरएचची टीमही घटनास्थळी पोचली. तीन ते चार तासांनंतर ११ मृतदेह तलावातून बाहेर काढले. (Khandwa)
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. तसेच मृताच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात शोक व्यक्त केला. मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रधानमंत्री राहत कोषातून दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपये मदतीची घोषणा केली.
मयताची नावे अशी, दिनेश (१३ वर्ष) आरती (१३), उर्मिला (१६ वर्ष), शर्मिला (१५ वर्ष), गणेश (२० वर्ष), किरण (१६ वर्ष), पाटली (२५ वर्ष), रेवसिंह (१३ वर्ष), आयुष (९ वर्ष), संगीता (१६ वर्ष), चंदा (८ वर्ष).