नवी दिल्ली : राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकावेत, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी केली. (Hosbale)
५० वर्षांपूर्वी आणीबाणी लादल्याबद्दल काँग्रेसवर टीकाही त्यांनी केली.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर केली. २१ महिन्यांच्या या काळात नागरी स्वातंत्र्यांवर गदा आणण्यात आली. विरोधी नेत्यांवर आणि माध्यमांवर स्वातंत्र्यावर क्रूर हल्ला करण्यात आला, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना होसाबाळे यांनी, आणीबाणीच्या काळात काँग्रेस सरकारने प्रस्तावनेत समाविष्ट केलेले समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द तसेच राहावेत का, यावर विचार करण्याची जोरदार मागणी केली. (Hosbale)
आणीबाणी लादल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी करत ते म्हणाले, ‘‘ज्यांनी अशी कृत्ये केली ते आज संविधानाची प्रत घेऊन फिरत आहेत. त्यांनी अजूनही माफी मागितलेली नाही. तुमच्या पूर्वजांनी ती चूक केली होती. तुम्ही यासाठी देशाची माफी मागितली पाहिजे,’’ अशी मागणी करत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले.
आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून देताना होसबाळे यांनी, त्या काळात हजारो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांचा छळ करण्यात आला, तर न्यायपालिका आणि माध्यमांच्या स्वातंत्र्यावरही मर्यादा आणण्यात आल्या. (Hosbale)
‘‘आणीबाणीच्या काळात मोठ्या प्रमाणात सक्तीने नसबंदीही करण्यात आली होती,’’ असेही होसबाळे यांनी म्हटले आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बुधवारी (२५ जून) हा दिवस आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला ५० वर्षे झाल्यानिमित्त ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा केला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात होसाबाळे यांनी हे विधान केले.