Congress demands loan waiver : कर्जमाफी तत्काळ द्या : काँग्रेस

Congress demands loan waiver

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची गरज असताना महायुती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने कर्जमाफी समितीचा खेळ न करता तातडीने कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी दिला. (Congress demands loan waiver)

ते म्हणाले की, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारला असता त्यांना दमदाटी केली. ही दादागिरी चालणार नाही. तुम्ही जनतेचे सेवक आहात मालक नाहीत, याचे भान ठेवा. कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा करता, आश्वासन देताना समितीची आठवण आली नाही का? राज्याची आर्थिक परिस्थिती दिसली नाही का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सकारकडे निधी नाही तर अदानी अंबानीसाठी लाखो करोडो रुपयांचा लाभ देण्यासाठी पैसा येतो कोठून? शेतकऱ्यांना व लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे म्हटले की तिजोरीची आठवण येते का?, असा सवाल त्यांनी केला. (Congress demands loan waiver)

जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. शेतमालाला हमीभाव नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत, असे सांगून ते म्हणाले की, भाजपा युती सरकार हे फक्त अदानी अंबानीसाठी पायघड्या घालते, पण शेतकरी व राज्यातील भगिनींना पैसे देताना चालढकल करत आहे. सुरजागडच्या खाणीतून मलई खाणार, समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार, घोडबंदर भाईंदर बोगदा प्रकल्पात भ्रष्टाचार, पुणे रिंग रोड आणि आता अदानीच्या हितासाठी शक्तीपीठच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचा उद्योग फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा सुरु आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला.

सरसकट कर्जमाफी द्या : पटोले

देशात सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली आहे. (Congress demands loan waiver)

कर्जमाफीची घोषणा करा : थोरात

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका, ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे, सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. थोरात म्हणाले, आज सरकारकडे लाखो कोटी रुपयांचे महामार्ग आणि विविध प्रकल्प उभारण्यासाठी पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र सरकारी तिजोरी रिकामी असल्याचा देखावा केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती कशाला पाहिजे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :
नरेंद्र मोदी तुम्ही कधी बोलणार?
शेतकरी कर्जमाफीसाठी समितीची काय गरज? : शेट्टी

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर