अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०२३ च्या राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी अनिल धाकू कांबळी (कणकवली) यांच्या ‘इष्टक’, तर ऐश्वर्य पाटेकर (नाशिक) यांच्या कासरा या संग्रहांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार निवडीसाठी परिक्षक म्हणून जेष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे, जेष्ठ कवी भीमराव धुळुबुळू यांनी काम पाहिले.   प्रत्येकी पाच हजार रूपये, गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्रदान समारंभ दि. १८ डिसेंबर, २०२४ रोजी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे होणार आहे.

धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार यापूर्वी श्रीधर नांदेडकर, श्रीकांत देशमुख, वीरधवल परब, कल्पना दुधाळ, संजीवनी तडेगावकर, अरुण इंगवले, पी.  विठ्ठल, सुरेश सावंत, अजय कांडर, सारिका उबाळे, सुचिता खल्लाळ, पद्मरेखा धनकर, दीपक बोरगावे, कविता मुरुमकर, हबीब भंडारे, गोविंद काजरेकर, राजेंद्र दास, केशव देशमुख, कीर्ती पाटसकर आदींना देण्यात आला आहे. समारंभास साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य सभेचे कार्याध्यक्ष दि. बा. पाटील आणि कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.

Related posts

समाजवादी शवपेटीवर गडहिंग्लजला शेवटचा खिळा

मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही :  डॉ.श्रीपाल सबनीस, दमसा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

गडहिंग्लज येथे दमसा साहित्य संमेलनाचे आयोजन; शनिवारी, रविवारी भरगच्च कार्यक्रम