बेळगाव : प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आमचा लढा महाराष्ट्रात जाण्यासाठी आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र सरकार आमच्या पाठीशी आहे की नाही अशी शंका वाटते. ३९ वर्षे झाली कन्नड सक्तीला आजही सक्ती आहेच. सत्तर वर्षे आम्ही सीमा प्रश्नाचा लढा देतोय. आपण एकजुटीनेच लढा देऊन सीमाप्रश्न सोडवून घ्यायला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले. (Martyrs honoured)
कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्याना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर बोलत होते.यावेळी कार्यकर्त्यांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. (Martyrs honoured)
कर्नाटक सरकारने सीमाभागात कन्नड सक्ती केली. त्याच्या निषेधार्थ बेळगावात कन्नड सक्ती विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. १
जून १९८६ रोजी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व शरद पवार यांनी केले होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात आठ जणांनी हौतात्म्य पत्करले.कन्नड सक्ती विरोधी आंदोलन दडपण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यामुळे बेळगाव शहर आणि ठिकाठिकाणी आंदोलने झाली. दरवर्षी १ जून रोजी हुतात्मा स्मारक येथे कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्याना अभिवादन करण्यात येते. हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्याच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीची नेते मंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Martyrs honoured)