मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या खटल्यातील सात आरोपींना निर्दोष सोडण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा या सातजणांमध्ये समावेश आहे. (Malegaon Victims move HC)
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची पुराव्याअभावी केलेली निर्दोष सुटका रद्द करण्याची मागणी अपीलात केली आहे.
निसार अहमद सय्यद बिलाल आणि इतर पाच जणांनी सोमवारी (८ सप्टेंबर) त्यांचे वकील मतीन शेख यांच्यामार्फत विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ मोटारसायकलला बांधलेल्या स्फोटकाचा स्फोट झाला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि १०१ जण जखमी झाले होते.(Malegaon Victims move HC)
या खटल्याचा निकाल ३१ जुलै रोजी विशेष एनआयए न्यायालयाने दिला. यात सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. या निकलाविरोधात याचिकार्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.(Malegaon Victims move HC)
विशेष न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, केवळ संशय खऱ्या पुराव्याची जागा घेऊ शकत नाही आणि दोषी ठरवण्यासाठी कोणतेही ठोस किंवा विश्वासार्ह पुरावे नाहीत.
मालेगाव बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर जवळजवळ १७ वर्षांनी, ३१ जुलै २०२५ रोजी विशेष न्यायालयाने सर्व ७ आरोपींची निर्दोष सुटका केली. प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्याव्यतिरिक्त, आरोपींमध्ये मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश होता.