कोल्हापूर : प्रतिनिधी : १९७५ पूर्वीच्या मध्यमवर्गाचा चळवळ, साहित्य, नाट्य, कला यासह सामाजिक कार्याशी संबध होता. त्यावेळी मध्यमवर्गीय आर्थिकदृष्ट्या संकुचित असूनही सामाजिकदृष्ट्या व्यापक विचार करत होता. सध्याचा मध्यमवर्गीय आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही सामाजिकदृष्ट्या तुटला आहे. त्यामुळे त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडला असल्याने त्याची विचारशक्ती संपली आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केली. (Ketkar)
अनंत दीक्षित स्मृती समिती आयोजित अनंत दीक्षीत व मोहन मस्कर स्मृती पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते कुमार केतकर यांना ५१ हजार, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांना मोहन मस्कर स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. २१ हजार रुपये, गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित होते. (Ketkar)
कुमार केतकर म्हणाले, समाजातील मध्यमवर्गीय दुरचित्रवाणी आणि सोशल मिडियाच्या आहारी गेला आहे. सोशल मिडियावरील बातम्यांची शहनिशा न करता तो विश्वास ठेवतो. त्याच्यातील जीवनरस निघून गेला आहे. मध्यमवर्गीय आर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्याने सामाजिक चळवळीपासून तो तुटला आहे. त्यामुळे सोशल मिडियावरील जी गोष्ट चुकीची आहे तेच सत्य समजून वागत असल्याने देश चालवणारी मंडळी त्याचा फायदा घेत आहे. अमेरिका, इंग्लंडमधील शिकलेले सुशिक्षित पोलिस, न्यायालय, राजकारणात आहे. तेच लोक आज कुणाच्या तरी हितासाठी देश चालवत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, केतकर याचा समाजाविषयीचा दृष्टीकोन वेगळा आहे. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो मजबूत असेल तर लोकशाही टिकेल. पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, अनंत दीक्षित आणि कोल्हापूरकरांचे नाते ऋणानुबंधनाचे होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित हा कार्यक्रम समाजाला दिशा देणार आहे. आमदार सतेज पाटील यांनी लेखणीच्या माध्यमातून अनंत दीक्षित यांनी कर्तुत्वाची छाप पाडल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी दीक्षितांच्या आठवणी सांगून उजाळा दिला. (Ketkar)
महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांनी प्रास्ताविक केले. अग्रोवनचे संपादक अदिनाथ चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी सकाळचे संपादक सम्राट फडणीस, सकाळ पुणेचे वृत्तसंपादक धनंजय बिजले, लोकमतचे वरिष्ठ संपादक विश्वास पाटील, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, वसंत भोसले, डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (Ketkar)