पंडित नेहरू आणि गुरुदत्तः संवेदनशील भारताच्या कल्पनेचे ओझे वाहणारे द्रष्टे

राज्यसभा सदस्य मनोज कुमार झा हे प्रभावी वक्ते आहेत, तसेच ते प्रतिभावंत लेखकही आहेत. मनोज कुमार झा यांनी गुरुदत्त आणि नेहरु यांच्या दृष्टिकोनावर आधारित एक लेख लिहिला आहे. तो मूळ इंग्रजीत फ्रंटलाइनमध्ये प्रकाशित झाला होता. त्याच लेखातील काही प्रमुख मुद्द्यांचा सारांश येथे साभार देत आहोत. (Gurudutt-Nehru and loneliness of modern india)

  • मनोज कुमार झा

जग हळूहळू सहानुभूती आणि नैतिक संवेदनशीलतेपासून दूर जात होते, त्या काळात पंडित नेहरू आणि गुरूदत्त एका मानवी, संवेदनशील भारताच्या कल्पनेचे ओझे वाहत होते. त्यांची ही सामायिक वेदना आजही देशाला अस्वस्थ करत राहते, कारण आता संवेदनहीनतेलाच परिपक्वता समजले जाऊ लागले आहे. (Gurudutt-Nehru and loneliness of modern india)

अलीकडच्या काळात माझ्या मनात गुरुदत्त आणि जवाहरलाल नेहरू यांच्यात असेच एक अनपेक्षित नाते सतत उमटत राहिले आहे. एक जण सिनेमाच्या नाजूक जगाशी जोडलेला होता, तर दुसरा राजकारण आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रचंड अपेक्षांनी व्यापलेल्या रंगमंचाशी. तरीही स्मृतीच्या शांत दालनांत हे दोघे एकमेकांशी संवाद साधताना भासतात. कदाचित, दोघेही आपलै काळ तीव्र संवेदनशीलतेने अनुभवताना त्या ओझ्याखाली जगत होते.

काही लोक असे असतात, जे आपल्या काळाशी पूर्णपणे जुळवून घेत नाहीत. म्हणूनच त्यांचे यश कितीही मोठे दिसले, तरी त्याच्या आत एक खोल एकाकीपण दडलेले असते. गुरुदत्त आणि नेहरू हे निःसंशयपणे अशाच प्रकारचे लोक होते. ते केवळ सार्वजनिक भूमिका निभावणारे व्यक्ती नव्हते; तर आधुनिक भारताच्या एकाकीपणाशी झुंज देणारे, अत्यंत आत्मपरीक्षणशील आणि संवेदनशील मनाचे होते. (Gurudutt-Nehru and loneliness of modern india)

गुरूदत्तची वेदना (Gurudutt-Nehru and loneliness of modern india)

आज आपण प्यासा पाहतो, तेव्हा तो केवळ एक चित्रपट वाटत नाही; ती एका संस्कृतीची खोल करुण हाक वाटते. प्रतिष्ठा, नफा आणि दिखाऊ नैतिकतेने व्यापलेल्या समाजात भटकणारा विजय हा फक्त गुरुदत्तचे पात्र राहत नाही. आत्मपरीक्षणाची क्षमता हरवू लागलेल्या समाजाने ज्याला अप्रासंगिक ठरवले, अशा प्रत्येक विचारशील माणसाचे तो प्रतीक बनतो.

समाज त्या कवीला ओळखत नाही एवढीच त्या चित्रपटाची शोकांतिका नाही; तर याहून मोठी शोकांतिका म्हणजे समाजाकडे आता वेदना ओळखण्याची भावनिक क्षमताच उरलेली नाही.

गुरुदत्तच्या सिनेमातील वेदना किंचाळत नाही; ती आत कुठेतरी स्थिरावते. एखाद्या विश्वासघातानंतर खोलीत बराच वेळ टिकून राहणाऱ्या शांततेसारखी. जणू वाद संपल्यानंतरही त्याचे प्रतिध्वनी भिंतींमध्ये अडकून राहतात. कदाचित म्हणूनच त्यांचा सिनेमा आजही आपल्याला अस्वस्थ करतो. तो आपल्यासमोर असे प्रश्न उभे करतो, ज्याच्याशी आधुनिक समाजाला सामना करणे कठीण जाते.

नेहरूंचे एकाकीपण

नेहरूंची पत्रे वाचताना किंवा `भारत एक खोज` पुन्हा पाहताना, तिथेही असाच एक खोल एकाकीपणा जाणवतो. हे एका अशा व्यक्तीचे एकाकीपण होते, ज्याच्यावर कोट्यवधी लोक प्रेम करत होते. जो आपल्या काळातील सर्वाधिक परिचित चेहऱ्यांपैकी एक होता; तरीही आतून विलक्षण एकटा होता.

तो सहवासाच्या अभावामुळे एकटा नव्हता; तर त्याची स्वप्ने आपल्या काळाच्या भावनिक क्षमतेपेक्षा आणि अनेकदा स्वतःच्या सहकाऱ्यांच्या कल्पनाशक्तीपेक्षाही खूप पुढे होती. (Gurudutt-Nehru and loneliness of modern india)

मात्र, दोघांमध्ये एक महत्त्वाचा फरक होता. नेहरूंची उदासी केवळ वैयक्तिक निराशेतून आलेली नव्हती; ती क्षुद्र मानसिकता, सांप्रदायिक चिंता आणि बौद्धिक विफलतेच्या वातावरणात आशा जिवंत ठेवण्याच्या प्रचंड थकव्यामुळे निर्माण झाली होती.

ज्यांना भारत हे तयार राष्ट्र म्हणून वारशात मिळाले, अशा पिढीतले नेहरू नव्हते. त्यांना आधी भारताची कल्पना करावी लागली. (Gurudutt-Nehru and loneliness of modern india)

नेहरू फक्त देश चालवत नव्हते; ते फाळणीनंतरच्या हिंसाचारातही संवेदनशीलतेची संस्कृती घडवण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित म्हणूनच त्यांच्या लेखनात अनेकदा अशा व्यक्तीचा थकवा जाणवतो, जी एकाच वेळी वर्तमानाशी आणि भविष्याशी संवाद साधत असते. नेहरूंना ठाऊक होते की कल्पनाशक्तीशिवाय राजकारण फक्त निर्जीव प्रशासन बनते. आणि करुणेशिवाय प्रशासन प्रेरणा देऊ शकत नाही.

सौंदर्यावरील श्रद्धा (Gurudutt-Nehru and loneliness of modern india)

गुरुदत्त आणि नेहरू या दोघांच्याही जीवनात सौंदर्यावरचा खोल विश्वास होता. त्यांच्यासाठी सौंदर्य हे केवळ सजावट किंवा कलात्मक विलास नव्हते; ते एक नैतिक मूल्य होते.

गुरुदत्तांनी मानवी दुर्बलता इतक्या कोमलतेने चित्रित केल्या, कारण त्यांना वाटत होते की दुःखालाही सन्मान मिळायला हवा. (Gurudutt-Nehru and loneliness of modern india)

नेहरूंनी कला, विज्ञान, साहित्य, स्थापत्य आणि सार्वजनिक संस्कृतीच्या संस्थांमध्ये गुंतवणूक केली, कारण त्यांचा विश्वास होता की सौंदर्यदृष्टीशिवायचे प्रजासत्ताक शेवटी भावनिकदृष्ट्या कठोर आणि संवेदनहीन बनते. त्यामुळे सौंदर्यावरील त्यांची बांधिलकी ही राजकीयही होती.

नेहरू आणि गुरूदत्त हे दोघेही आपल्याला आठवण करून देतात की संवेदनशीलता ही कमजोरी नसते. अश्रू, कविता, थांबून विचार करणे आणि आत्मसंशय — हे महानतेच्या आड येणारे अडथळे नसतात. अनेकदा तेच तिचे खोल आधार असतात.

गुरुदत्तांचे तुटलेपण, नेहरूंचा थकवा

नेहरू अधिक काळ जगले, पण त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस त्यांच्यात एक खोल थकवा स्पष्ट जाणवत होता. १९६२ चे युद्ध, सांप्रदायिकतेचे वाढते सावट आणि लोकशाही आदर्शांचे होणारे क्षरण — या सर्व गोष्टी त्यांना आतून हादरवत होत्या.

१९६४ मध्ये त्यांचे निधन झाले, तेव्हा तो केवळ एका पंतप्रधानाचा मृत्यू नव्हता; ती त्या पिढीच्या थकव्याची समाप्ती होती, जिने राजकारणाला मानवी बनवण्याचा प्रयत्न केला होता.

तरीही ते कधीच पूर्णपणे नाहीसे झाले नाहीत.

या अति-स्पर्धात्मक जगात जेव्हा एखादा संवेदनशील तरुण स्वतःला विसंगत आणि एकटा समजतो, तेव्हा गुरुदत्त पुन्हा जिवंत होतात.

जेव्हा कोणी म्हणतो की करुणेशिवाय लोकशाही अपुरी आहे, तेव्हा नेहरू पुन्हा परत येतात. (Gurudutt-Nehru and loneliness of modern india)

त्यांची उदासी आणि त्यांची करुणा अमर झाली, कारण त्यात नैतिक कल्पनाशक्तीचा खोल स्पर्श होता.

गुरुदत्त आणि जवाहरलाल नेहरू या दोघांनीही १९६४ मध्येच या जगाचा निरोप घेतला. इतिहास अशा योगायोगांची नोंद केवळ तारखांप्रमाणे करतो; पण काळ त्यांना वेगळ्या प्रकारे वाचतो.

गुरुदत्त आणि नेहरू हे अशा दोन सावल्या आहेत — एकाने प्रकाश आणि अंधाराच्या माध्यमातून काम केले, तर दुसऱ्याने संस्था आणि विचारांच्या माध्यमातून. एकाने `प्यासा` आणि `कागज के फूल` दिले; दुसऱ्याने जागतिक इतिहासाची झलक आणि एका प्रजासत्ताकाची रचना.

आणि म्हणूनच असे वाटते की गुरुदत्तांच्या धूसर सावल्यांमध्ये आणि नेहरूंच्या थकलेल्या गद्यातच भारताची खरी कथा दडलेली आहे.

Related posts

बशीर बद्र यांनी बकरीदच्या दिवशी स्वतःलाच कुर्बान केले

लोकशाही टिकवण्यासाठी टोकाचा संघर्ष करावाच लागेल

मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका….