संभाजी भिडेंची मागणी
कोल्हापूर : प्रतिनिधी : सहा जूनचा शिवराज्यभिषेक सोहळा कायमस्वरुपी बरखास्त करा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केली आहे. ते कोल्हापूरातील उजळाईवाडी विमानतळावर पत्रकाराशी बोलत होते. पत्रकारांशी बोलण्यापूर्वी संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी पाच मिनिटे चर्चा केली. दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारने शिवराज्यभिषेक सोहळा शासकीय पातळीवर साजरा करावा असा आदेश यापूर्वी काढला असून गेले दोन वर्षे शिवराज्यभिषेक दिनी शासकीय कार्यालयात गुढी उभारुन शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जातो. (Bhide demand)
पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडे यांनी सहा जून रोजी होणारा शिवराज्यभिषेक सोहळा कायमस्वरुपी बरखास्त झाला पाहिजे, अशी मागणी केली. आपण ब्रिटीशांच्या गुलामगिरीत किती काळ राहणार असा सवाल करत त्यांनी तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा झाला पाहिजे असेही ते म्हणाले. शिवराज्यभिषेक सोहळ्याचा वापर राजकारणासाठी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये. कुत्र्याच्या पुतळ्याचे राजकारण करु नये असेही भिडे गुरुजी म्हणाले. इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच पुरावा नाही असे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे या पत्रकारांच्या प्रश्नांवर भिडे यांनी वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबतचा निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. (Bhide demand)
संभाजी भिडे यांच्या मागणीबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, तिथीऐवजी तारखेंने राज्यभिषेक सोहळा साजरा करण्याचा सर्वमान्य निर्णय झाला आहे. राज्य सरकारनेही सहा जून रोजी शिवराज्यभिषेक साजरा करावा असे आदेश काढला आहे. दरवर्षी तिथी वेगवेगळ्या तारखेने येते. काही वेळा तिथीनुसार येणाऱ्या शिवराज्यभिषकदिनी मोठा पाऊस असतो. म्हणून सर्व शिवभक्तांच्या सूचनेनंतर सहा जून ही शिवराज्यभिषेक सोहळ्याची तारीख निश्चित केली आहे. आणि राज्य सरकारनेही मान्यता दिली आहे. (Bhide demand)