ZEENAT: झीनत तीन आठवड्यांनी परतली…

ZEENAT

भुवनेश्वर : ती निघून गेली. सगळे हवालदिल झाले. अनेक ठिकाणांहून प्राण्यांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे तर सगळे अधिकच धास्तावले. जंग जंग पछाडले आणि शेवटी ती तीन आठवड्यांनी परतली. भुवनेश्वरच्या सिमलीपाल येथे महाराष्ट्रातील ताडोबातून आणलेल्या झीनत या वाघिणीची ही कथा… (ZEENAT)

सिमलीपाल येथील व्याघ्र प्रकल्पांतील वाघांची संख्या वाढावी, यासाठी झीनतला महाराष्ट्रातील ताडोबा येथून नोव्हेंबरमध्ये आणण्यात आले होते. ८ डिसेंबरनंतर ती झारखंड आणि पश्चिम बंगालच्या वनक्षेत्रात भरकटत गेली होती. येथील वनकर्मचाऱ्यांनी तिचा शोध घेण्यासाठी पायाला अक्षरश: भिंगरी लावली. जवळपास तीन आठवडे शोध घेतला. मात्र त्यांना यश आले नाही. (ZEENAT)

दरम्यान, झीनतने जंगलाशेजारील मानवी वस्तीत धुमाकूळ घातला होता. पाळीव प्राण्यांवर हल्ला करून फडशा पाडणे सुरू केले होते. या काळात तिने जवळपास आठ शेळ्या फस्त केल्या. इतर प्राण्यांवरही हल्ले केले. त्यामुळे दहशतीचे साम्राज्य निर्माण झाले होते. शेवटी तिला पकडण्यात यश आले.

शेवटी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) मदतीने तिला कोलकाता येथील अलीपूर प्राणीसंग्रहालयातून सिमिलीपालला सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले, असे राज्याच्या वरिष्ठ वन अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. (ZEENAT)

तिने तीन राज्यांचा प्रवास केला होता. तिला थकवा असला तरी तिची प्रकृती उत्तम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी सकाळी तिला सुरक्षित बंदिस्त अधिवासात सोडण्यात आले. तिला पुरेशी शिकार आणि पाणी पुरवले जात आहे. त्यामुळे झीनत हळूहळू नवीन अधिवासाशी जुळवून घेईल. त्यानंतर तिला व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related posts

राजस्थानात उंटपालन करणारा रबारी समाज अडचणीत

डोळे आणि कवटी नसलेल्या दुर्मीळ माशाचा शोध

भ्रष्टाचार कनेक्ट, सुरक्षितता मिसिंग आणि महाराष्ट्र खड्ड्यात