धाराशिव : प्रतिनिधी : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. पुरातत्व खात्याकडून मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मंदिरातील गांभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे. भाविकांना दहा दिवस मुख दर्शन घेता येणार आहे. मंदिर प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. (Tulaja Mandir)
तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज येतात. मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने पुरातत्व खात्याकडून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कामा हाती घेण्यात आले आहे. देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जिर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस काम बंद राहणार आहे. (Tulaja Mandir)
मंदिराच्या गाभाऱ्यातील दुरुस्तीवरुन मागील काही दिवस वाद निर्माण झाला होता. मात्र पुरातत्व खात्याकडून अखेर काम सुरू करण्यात येत आहे. हे काम १ ऑगस्ट १० ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार असून या कालावधीत भाविकांना फक्त मुख दर्शन घेता येणार आहे. भाविकांना गैरसोय होणार नाही, यासाठी मुखदर्शन ठेवण्यात आले आहे. (Tulaja Mandir)
दरम्यान दहा दिवसात मंदिराच्या गाभाऱ्याच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू राहणार असले तरी देवीचे नियमित होणारे सर्व धार्मिक विधी सिंहासन पूजा, अभिषेक पूजा हे सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानाकडून देण्यात आली आहे.