जमीर काझी : मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतासोबत ठामपणे उभे आहोत. मी सरकारसाठी नव्हे तर एक भारतीय म्हणून परराष्ट्र दौऱ्यात गेलेल्या शिष्टमंडळात सहभागी झाले होते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी व्यक्त केले. (Sule statement)
शिष्टमंडळाच्या माध्यमातून कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया व इजिप्त या चार देशांना भेट देऊन परतल्यानंतर मुंबईत त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, परदेशातील प्रत्येक बैठकीत स्थानिक नेत्यांकडून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या सर्व नेत्यांमुळे निर्माण झालेला ७५ ते ७६ वर्षांचा प्रवास सातत्याने उल्लेखला गेला, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. भारताकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. तिथल्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आपण आतंकवादाविरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. मात्र, त्याचवेळी शांततेच्या मार्गानेही वाटचाल करावी, ही भावना प्रत्येक देशाने वारंवार व्यक्त केली., पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण कारवाई केली, ती एक प्रतिक्रिया म्हणून अपेक्षित होतीच. ‘तुमच्यावर अन्याय झाला, त्याला उत्तर म्हणून कारवाई केली, हे योग्यच. परंतु, त्यानंतर संयम आणि समजूतदारपणा दाखवून तुम्ही तणाव कमी केला, याचे आम्हाला कौतुक वाटते,’ असे त्यांनी आवर्जून सांगितले. (Sule statement)
या चारही देशांमध्ये महात्मा गांधींचा मोठा प्रभाव असल्याचं प्रकर्षाने जाणवले. मी या दौऱ्यावर माझ्या देशासाठी शिष्टमंडळाच्या माध्यमातून गेले होते. मी कोणत्याही सरकारसाठी नव्हते, तर एक भारतीय म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत गेले होते. असे त्यांनी स्पष्ट केले.
नरेंदर सरेंडरबद्दल माहिती नाही
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या ‘नरेंद्र सरेंडर ‘या वक्तव्याबाबत आपणाला माहिती नाही, त्यामुळे त्याबाबत बोलू शकत नाही,असे सांगून सुळे म्हणाल्या की,केंद्र सरकारने अखेर जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मागणी आमच्या पक्षाच्या वतीने अनेक दिवसांपासून मागणी केली होती. ती मागणी पूर्ण होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. (Sule statement)