Moon dust: सोन्यापेक्षा ही धूळ आहे मौल्यवान

mahesh anand

लंडन : हे धुळीचे कण असले तरी सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत. कारण ती अमूल्य आहे. याच धुळीवरील संशोधनामुळे चंद्राच्या निर्मितीचा शोध लागणार आहे. विशेष म्हणजे चीनने ही धूळ कुणालाही दिली नाही. ती आपल्याला मिळाली आहे. म्हणूनच ती मौल्यवान आहे… हे उद्गार आहेत इंग्लंडमधील संशोधक प्रा. महेश आनंद यांचे. (Moon dust)

चंद्राच्या खडकाचे पहिले नमुने चीनने इंग्लंडला संशोधनासाठी दिले आहेत. ते आता मिल्टन केन्समध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहेत.

ही धूळ आमच्यासाठी सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत. कारण जगात कोणालाही चीनचे हे नमुने उपलब्ध नव्हते. म्हणून आमच्यासाठी हा एक मोठा सन्मान आणि मोठा विशेषाधिकार आहे, असे प्रा. आनंद सांगतात.

चीनकडून मिळालेले हे खडक लेसरने बारीक करण्यात येतील. त्यानंतर प्रा. आनंद यांची टीम त्यावर संशोधन करेल. या संशोधनातून चंद्राची निर्मिती कशी झाली आणि पृथ्वीच्या उत्पत्तीच्या सुरुवातीच्या वर्षांबद्दलच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरेही मिळतील अशी त्यांना आशा वाटते. (Moon dust)

४.५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी मंगळाच्या आकाराच्या ग्रहावर आदळली. तेव्हा यातून बाहेर पडलेल्या ढिगाऱ्यापासून चंद्राची निर्मिती झाली, असा शास्त्रज्ञांचा सिद्धांत आहे. या सिद्धांताला पुष्टी देणारे पुरावे या धुळीच्या कणांमध्ये असू शकतात, असा विश्वास डॉ. आनंद यांना वाटतो.

२०२० मध्ये चीनच्या चांग’ए ५ अंतराळ मोहिमेने मोन्स रुमकर नावाच्या ज्वालामुखी क्षेत्रात उतरल्यावर हे खडक गोळा केले.

गेल्या आठवड्यात बीजिंगमध्ये एका विशेष समारंभात प्रा. आनंद यांना खडक असलेली कुपी देण्यात आली. यावेळी रशिया, जपान, पाकिस्तान आणि युरोपमधील सहकारी उपस्थित होते.

‘‘ही भेट म्हणजे जवळपास एका समांतर विश्वासारखीच आहे. अंतराळ कार्यक्रमांतील गुंतवणुकीत इंग्लंडच्या तुलनेत चीन आपल्यापेक्षा खूप पुढे आहे,’’ असे ते म्हणाले.

चीनमधून ही मौल्यवान कुपी खूप काळजीपूर्व आणि अगदी सुरक्षितरित्या घेऊन ते युकेला परतले.

मिल्टन केन्स येथील मुक्त विद्यापीठातील त्यांच्या प्रयोगशाळेत यावर संशोधन सुरू करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेत जाताना कमालीची स्वच्छता बाळगली जाते. (Moon dust)

कारण जर पृथ्वीवरील पदार्थ चंद्रावरील धुळीत मिसळले तर ते प्रा. आनंद यांच्या टीमने केलेले विश्लेषण कदाचित चुकीचे ठरू शकते किंवा ते कायमचे खराब होऊ शकते.

आणलेल्या धुळीपैकी केवळ ६० मिली ग्रॅम धूळ संशोधनासाठी पुरेसी आहे, असे प्रा. आनंद सांगतात. ‘‘एवढीशी असली तरी ती खूप शक्तिशाली आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, येणाऱ्या वर्षांसाठी आम्हाला व्यस्त ठेवण्यासाठी तेवढीशी धुळही पुरेसी आहे. कारण आम्ही सूक्ष्मातल्या सूक्ष्म बाबींवर काम करण्यात विशेषज्ञ आहोत,’’ असा विश्वास ते व्यक्त करतात.

प्रा. आनंद चंद्राच्या निर्मितीचे कोडे उलगडतील आणि आधीचा सिद्धांत बळकट होईल, असा विश्वास संशोधन विश्वाला वाटत आहे.

(सौजन्य : बीबीसी)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर