कोल्हापूर : प्रतिनिधी : उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वनतारा वन्यजीव बचाव, पुनर्वसन, संवर्धन केंद्रात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथून नेलेल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची गरज असून त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नांदणी मठाधीश यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर पालकमंत्री आबिटकर यांनी ही माहिती दिली. (Mahadevi elephant)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठातून महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये नेण्यात आल्यानंतर नांदणीवासियांसोबत कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. वनतारातून महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. बायकॉट जिओ, एक लाख सह्यांची मोहिम, नांदणी ते कोल्हापूर ४५ किलो मीटरची पदयात्रा अशा मोहिमा सुरू झाल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महायुतीतील खासदार धैयर्शिल माने, धनंजय महाडिक यांनी वनताराशी संपर्क साधला. शुक्रवारी वनताराची टीम आज कोल्हापूरात खास विमानाने कोल्हापुरात दाखल झाली. ही टीम नांदणीला जैन मठाधीशांना भेटण्यासाठी जाणार होती. पण कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने या टीमला नांदणीला जाण्यासाठी परवानगी नाकारली. (Mahadevi elephant)
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराची टीम आणि नांदणी मठाचे जैन महास्वामी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीतून जैन महास्वामी तडकाफडकी बाहेर पडले. माध्यमांशी बोलायला महास्वामींनी नकार दिला.
बैठकीनंतर पालकमंत्री आबिटकर यांनी माहिती दिली. नांदणी मठाने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात. वनतारा त्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केले. जर न्यायालयाच्या सूचना आल्या तर आम्ही त्यापद्धतीने कार्यवाही करु. आमचा या प्रकरणाशी संबध नाही असे वनताराच्या सीईओंनी म्हटल्याचे आबिटकरांनी माहिती दिली. (Mahadevi elephant)