इम्फाळ : ‘‘मणिपूर या नावातच ‘मणि’ आहे. ते एक रत्न आहे. भविष्यात संपूर्ण ईशान्येकडील राज्याची चमक हे राज्य वाढवेल. काही काळापूर्वी, याच व्यासपीठावरून सुमारे ७,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. हे प्रकल्प लोकांचे, विशेषतः मणिपूरच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समुदायांचे जीवन सुधारतील. ते तुम्हा सर्वांसाठी आरोग्य आणि शिक्षणाच्या नवीन सुविधा प्रदान करतील,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी शनिवारी (१३ सप्टेंबर) केले. (PM Manipur Visit)
गेल्या दोन वर्षांत वांशिक हिंसाचारात पोळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलीच भेट दिली. त्यांच्याहस्ते चुराचांदपूरमध्ये विविध विकासकामांची पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
मोदी म्हणाले, ‘‘मणिपूरची भूमी ही धैर्य आणि दृढ संकल्पभूमी आहे. येथील पर्वत आणि टेकड्या निसर्गाची अमूल्य देणगी आहेत, तशाच त्या तुमच्या परिश्रमाचे प्रतीकही आहेत. मी मणिपूरच्या लोकांच्या आत्म्याला सलाम करतो.’’ (PM Manipur Visit)
“केंद्र सरकार या प्रदेशाचा विकास घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे. ७००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पाचे उद्घाटन आज झाले. यामुळे मणिपूरमधील लोकांचे आणि येथील दुर्गम भागात राहणाऱ्यांचे जीवन सुधारेल,” असे ते म्हणाले.
“मणिपूर हे आंतरराष्ट्रीय सीमा असलेले राज्य आहे. येथे कनेक्टिव्हिटी हा एक मुद्दा आहे. खराब रस्त्यांमुळे येणाऱ्या समस्यांबद्दल मला माहिती आहे. २०१४ नंतर, मी मणिपूरच्या कनेक्टिव्हिटीवर काम केले. आम्ही मणिपूरमध्ये रेल्वे आणि रस्त्यांसाठी बजेट वाढवले आहे आणि रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर दिला आहे,” असे श्री. मोदी म्हणाले. (PM Manipur Visit)
विकासासाठी शांततेला सर्वोच्च प्राधान्य
मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना, पंतप्रधान मोदींनी राज्यात ‘विकासासाठी शांतता सर्वोपरि’ असण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी हिंसाचाराने प्रभावित झालेल्या आणि अंतर्गतरित्या विस्थापित झालेल्या लोकांची भेट घेतली.
“खोऱ्या आणि डोंगराळ भागातील गटांशी शांतता चर्चेसाठी सुरुवात झाली आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (PM Manipur Visit)