कोल्हापूर : प्रतिनिधी : बंगालाच्या उप सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या चिंतेचे सावट वाढले आहे. पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अगोदरच अतिवृष्टीने शेतकरी कंगाल झाला असताना पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट गडद झाले आहे. (Heavy rains again)
अतिवृष्टीने यापूर्वी मराठवाड्याची दाणादाण उडवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्र्यांनी मराठवाडाचा दौरा करुन अतिवृष्टीतील नुकसानीची पाहणी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला आहे. अतिवृष्टीतून मराठवाडा सावरत आहे असे वाटत असताना शुक्रवारपासून पुन्हा पावसाने सुरूवात केली आहे. मराठवाड्यातील जालना, धारशिव, बीड, संभाजीनगरात जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसास सुरूवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. (Heavy rains again)
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवरात्रोत्सवाचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यातच पाऊस झोडपून काढत असल्याने कोल्हापूर आणि तुळजापुरातील नवरात्रोत्सवावर चांगलाच परिणाम झाला. देवीचा वार शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर, तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. कोल्हापुरात आज अंबाबाईची पालखी टेंबालाई टेकडीवर त्र्यंबुली देवीच्या भेटीस जाते. पण पावसामुळे पालखी सोहळ्याच्या स्वागत करणाऱ्या मंडळांच्या उत्साहावर विरजन पडले आहे.
मुंबई आणि ठाण्यात पावसाच्या सरी कोसळत असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली असून पाणी साचण्याचे प्रकार घडले आहे. सकाळपासून गोरेगाव, मालाड, अंधेरी, सांताक्रूझ, कांदिवली, दादर भागात जोरदार पाऊस पडत आहे. सकाळी 8 नंतर मुंबईतील काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. पुणे सातारा मार्गावर खंबाटकी घाटात अजवड वाहने बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Heavy rains again)
अतिवृष्टीने मराठवाड्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना पुन्हा पावसाच्या जोरदार कोसळू लागल्याने ग्रामीण भागातील जनतेचे कंबरडे मोडले आहे. सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर या दुष्काळी जिल्ह्यात हातातोंडाशी आलेल्या पिकाचा घास पावसाने हिसकावून घेतला आहे. ग्रामीण भागातील जनता सरकारी मदतीकडे डोळे लावून बसली आहे.