ज्योती नावाची एक मध्यमवर्गीय, परिस्थितीने गांजलेली, कौटुंबिक जबाबदाऱ्या शिरावर असलेली तरुणी, आपल्या पोटापाण्यासाठी आणि विशेषतः आपल्या कुटुंबाला कर्जाच्या ओझ्याखालून सोडवून आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी इराकच्या एका गारमेंट फॅक्टरीत नोकरी मिळविते. पण तिथे पोहोचताच तिच्यासमोर स्फोटकांनी बांधलेली एक निष्पाप मुलगी दहशतवादाला बळी पडते. या धक्क्यातून सावरून ज्योती आपल्या कामाला लागते. काही दिवसांतच ती स्वतःच आयसिस या अतिरेकी संघटनेच्या ताब्यात सापडते आणि त्यानंतर तिचा संघर्ष सुरू होतो. शासन-प्रशासन सगळंच अतिरेक्यांच्या हाती गेलेल्या इराकसारख्या परक्या भूमीवर एका भारतीय तरुणीने स्वतःच्या आणि सोबत इतर अन्यायग्रस्तांच्या सुटकेसाठी दाखविलेल्या जिद्दीची, चिकाटीची आणि झुंजीची “अकेली” नावाची गोष्ट दिग्दर्शक प्रणय मेश्राम यांनी तितक्याच परिणामकारकपणे रुपेरी पडद्यावर दाखवली आहे.
सॅबी परेरा
सत्ता आणि पैशासाठी चाललेल्या पुरुषी संघर्षात बळी जाणारी नेहमीच एक स्त्री असते. “अकेली” हा सिनेमा देखील हे वास्तव अधोरेखित करतो. या सिनेमात, विमा कंपनीने भरपाई नाकारल्यानंतर त्याचा भार ज्यांच्यावर पडतो आणि ज्यांचं भवितव्य टांगणीला लागते त्या स्त्रियाच आहेत. मानवी बॉम्ब बनविण्यासाठी एका कोवळ्या मुलीचा वापर केला जातो. दहशतवादी पुरुषांच्या वासना भागवण्यासाठी लैंगिक गुलामासारख्या वापरल्या जाणाऱ्या कोवळ्या मुली आणि तरुणीच आहेत. स्वबळावर व्यवसाय करणारी आणि इतरांना रोजगार देणारी अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडणारी गारमेंट फॅक्टरीची मालकीणही एक स्त्रीच आहे. स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या या भोगांवर तसेच धर्माच्या आवरणाखाली वाढत असलेल्या कट्टरतेवर आणि हुकूमशाही मानसिकतेवर हा सिनेमा भाष्य करतो. (Akeli cinema)
ज्या प्रमाणे ‘गदर’ मधील तारासिंह आपल्या एकट्याच्या ताकदीवर पाकिस्तान सारख्या देशाला नामविण्याचे अचाट आणि अविश्वसनीय काम करतो तसं काही या सिनेमाची नायिका करीत नाही. या सिनेमाची नायिका ही एक सामान्य युवती आहे आणि त्यामुळे तिला लार्जर देन लाईफ दाखविण्यापेक्षा कठीण परिस्थितीतही हिंमत न हारण्याची तिची जिद्द आणि काहीही करून आपल्या कुटुंबापाशी पोहोचण्याची तिची इच्छाशक्ती हायलाईट करण्यावर या सिनेमाने भर दिला आहे आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत.
फारसा प्रभाव न पाडणारं पार्श्वसंगीत ही या सिनेमाची कमजोर बाजू म्हणता येईल.
चित्रपटाचा मुख्य भार नुसरत भरुचा या नायिकेच्या खांद्यावर आहे आणि नुसरतने हा भार उत्तमरित्या पेलला आहे. हा पूर्णपणे नुसरतचा चित्रपट आहे. रोमान्स, भीती, कारुण्य आणि धैर्य या सर्व भावना तिने अतिशय उत्तमरीत्या दाखविल्या आहेत. रफिकच्या भूमिकेतील निशांतचा वावर प्रसन्न आहे. त्याचे ज्योती सोबतचे रोमँटिक सीन उत्तम झाले आहेत. साही हालेवीचा अतिरेकी संघटनेचा म्होरक्याचा रोलही असरदार आहे.
उझबेकिस्तानच्या लोकेशनवर उभं केलेलं मोसुल शहर, इराकचं वाळवंट, अतिरेक्यांचा अड्डा, लष्कर, विमानतळ इत्यादींचे चित्रीकरण (विशेषतः ड्रोन फोटोग्राफी) सिनेमॅटोग्राफर पुष्कर सिंग यांनी अतिशय सुंदर केलेले आहे. (Akeli cinema)
कोणत्याही देशाचा, धर्माचा, जातीचा द्वेष न करताही अतिरेक्यांचा धार्मिक कटृरतावाद दाखवता येतो. खटकेबाज, टाळीबाज संवाद न वापरताही आपल्याला हवा तो संदेश देता येतो, नायक , नायिकेला लार्जर देन लाईफ दाखवून एकट्याने संघटित अतिरेक्यांचा बिमोड करताना दाखविण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर पडणारी नायिका अधिक मानवीय आणि खरी वाटते हे या सिनेमाचे यश आहे. (Akeli cinema)