रांची : झारखंडमध्ये रांचीतील विधानभवनावर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन ते तीन वेळा हवेत अश्रूधुरांची नळकांडी फोडली. लाठीमाराच्या घटनेने दिल्लीतील आंदोलनाची आठवण जागी झाली. काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यावरील लाठीमाराच्या घटनेंवर टीका केली आहे. (Lathi-charge on a student protest in Jharkhand)
जेपीएससी, जेएसएससी यासारख्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये झालेली पेपरफुटी, गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचे गेले आठवडाभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. झारखंड सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि काही परीक्षा रद्द केल्या आहेत. झारखंड लोकसेवा आयोगाच्या तिन्ही सदस्यांनी राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांच्याकडे राजीनामे सादर केल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे.
उपोषणाला बसलेले देवेंद्र नाथ रुग्णवाहिकेतून मोर्चात सामील
आज सोमवारी विद्यार्थ्यांनी विधानभवनावर मोर्चाची हाक दिली. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकाच्या मार्गात पोलिसांनी अडथळे उभारले होते. पोलिसांनी विविध ठिकाणी काटेरी तारांचे अडथळे उभे केले होते. तरीही विद्यार्थी मोर्चाने विधानभवनाकडे निघाले. विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगी झेंडे होते. जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करण्याची आणि सीबीआय चौकशीची मागणी करणारे फलक होते. नऊ दिवस उपोषणास बसलेले जेएलकेएमचे नेते देवेंद्र नाथ रुग्णवाहिकेतून मोर्चात सामील झाले होते. विद्यार्थ्यांनी तीन अडथळे पार करत जगन्नाथ मंदिराजवळ पोहोचले. तिथे विद्यार्थ्यांना थांबवण्यात आले. तरीही विद्यार्थी पुढे येत होते. आंदोलकांवर पोलिसांना पाण्याचे फवारे मारले. पण मोर्चा पांगण्याऐवजी आंदोलक विद्यार्थी नाचू लागले. (Lathi-charge on a student protest in Jharkhand)
शांततेत मोर्चा असताना लाठीमार का?
पोलिसांनी पाण्याचे फवारे बंद केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा विधानभवनाकडे कूच केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यामुळे विद्यार्थी पळू लागले. लाठीमारामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. शांततेत मोर्चा काढला असताना आमच्यावर लाठीमार का केला? असा प्रश्न विद्यार्थी आंदोलकांनी केला. विद्यार्थ्यांच्या ९८ टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या असून १४ वी जेपीएससी प्रारंभिक परीक्षा रद्द करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे.
राहूल गांधींची टीका
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील बळाचा वापर चुकीचा असल्याची टीका केली आहे. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांचा हक्क असून केवळ संवादातून तोडगा निघू शकतो. झारखंड सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून त्याच्या समस्या तात्काळ सोडवल्या पाहिजेत असेही गांधी म्हणाले. (Lathi-charge on a student protest in Jharkhand)