पुणे : युद्ध हे रोमँटिक नसते आणि तो बॉलिवूडचा सिनेमाही नसतो, अशा शब्दांत भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबविण्यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी टीका केली. (General Naravane slams)
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना जनरल नरवणे म्हणाले की जर आदेश दिला तर युद्धावर जाईन, परंतु राजनैतिकता ही त्यांची पहिली पसंती असेल.
ते म्हणाले की, परवाच्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांवर आघात झाला आहे. गोळीबाराने रात्री आश्रयस्थानात धावणारी मुले ही दृश्ये वेदनादायी आहेत. (General Naravane slams)
‘‘ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासाठी हा आघात पिढ्यानपिढ्या त्रास देत राहील. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर नावाची एक गोष्ट आहे. म्हणजे ज्यांनी भयानक दृश्ये पाहिलेली असतात. ती २० वर्षांनंतर आठवली तरी त्यांना घाम फुटतो. अशा लोकांची मानसिक काळजी घेण्याची आवश्यकता असते,’’ असे जनरल नरवणे म्हणाले.
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘युद्ध ही गोष्ट रोमँटिक नाही. ते तुमचे बॉलिवूड चित्रपटही नव्हेत. ते खूप गंभीर प्रकरण आहे. युद्ध किंवा हिंसाचार हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. म्हणूनच आपल्या पंतप्रधानांनी म्हटले आहे की, हा युद्धाचा काळ नाही. मूर्ख लोकांनी आपल्यावर युद्ध लादले तरी आपण त्याचा आनंद घेऊ नये.’’ (General Naravane slams)
‘‘युद्धाचे भयानक परिणाम माहीत असूनही लोक विचारत आहेत की आपण पूर्ण युद्ध का केले नाही? जर आदेश मिळाला तर एक लष्करी माणूस म्हणून मी युद्धात जाईन, पण ती माझी पहिली पसंती नसेल,’’ असे नरवणे म्हणाले.
जनरल नरवणे म्हणाले की त्यांची पहिली पसंती मुत्सद्देगिरी असेल. संवादाद्वारे मतभेद मिटवणे आणि सशस्त्र संघर्ष टाळण्याला प्राधान्य असेल.
‘‘राष्ट्रीय सुरक्षेत आपण सर्व समान भागीदार आहोत. आपण केवळ देशांमधीलच नव्हे तर आपापसांतील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मग ते कुटुंबांमध्ये असोत किंवा राज्ये, प्रदेश आणि समुदायांमधील असोत. त्यावर हिंसाचार हा उपाय नाही,’’ असे ते म्हणाले.
हेही वाचा :
शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात दणदणीत तेजी
भारतातील ३२ विमानतळे पुन्हा सुरू होणार