रायगड : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ५ व ६ जूनला दुर्गराज रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असा आदेश त्यांनी दिला. (Raigad Meeting)
रायगड येथे यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती घेतली. तसेच समितीकडून काय अपेक्षित आहे, याविषयीही त्यांनी स्पष्ट दिशा-निर्देश दिले. देशभरातून येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या सोयी-सुविधांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून, ऐतिहासिक रायगडावर हा सोहळा अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी सर्व स्तरांवरील नियोजन भक्कमपणे करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (Raigad Meeting)
दरम्यान, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था यांचा समन्वय साधून सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात येईल. सोहळ्यात देशभरातून लाखो शिवभक्त सहभागी होणार आहेत. त्यामुळे सुरक्षा, आरोग्य ते वाहतूक व्यवस्थेपर्यंत प्रत्येक बाबतीत काटेकोर नियोजन करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले. या बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरीक्त जिल्हाधिकारी रविंद्र शेळके, अतिरीक्त मुख्य कार्यकरी अधिकारी सत्यजित बडे, समितीचे अध्यक्ष संदिप खांडेकर, मा.अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, उपाध्यक्ष सत्यजित भोसले, उपाध्यक्ष अतुल चव्हाण, उपाध्यक्ष सौ.चैत्राली कारेकर, उपाध्यक्ष प्रशांत दरेकर, पदाधिकारी संजय पोवार, विनायक फाळके, प्रविण पोवार, विश्वास निंबाळकर, समितीचे सचिव अमर पाटील, भारतीय पुरातत्त्व विभागाचे जे.जी. देवकुळे, रायगड विकास प्राधिकरणचे स्थापत्य विशारद वरूण भामरे, कार्यकारी अभियंता विशष स्थापत्य विभाग सलोनी निकम, आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
आपण किती राफेल विमाने गमावली : रेवंत रेड्डी