नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्गाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी किंवा आठ पदरी करावे व राज्य सरकारवर पडणारा शक्तीपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली. (Shetty’s demand to Gadkari)
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले कि, सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग कमी रहदारीचा असल्याने तोट्यात चाललेला आहे.भविष्यात गरज पडल्यास केंद्र सरकार या महामार्गाचे रूंदीकरण करण्यास कोणतीही अडचण नसून सध्या या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी सहा पदरी व आठ पदरीच्या अनुषंगाने जमीन संपादनही झालेले आहे. केंद्र सरकारने लगेचच या महामार्गाचे सहापदरी किंवा आठ पदरी केल्यास जनतेवर टोलचा बोजा पडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिली. (Shetty’s demand to Gadkari)
राज्य सरकारने कुठल्याही देवस्थान समिती अथवा भक्तांनी मागणी केली नसताना शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे. पवनार ते पत्रादेवी पर्यंत असणारे सर्व देवस्थान हे रत्नागिरी -नागपूर या सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गालगत आहेत. कोणत्याही देवस्थानला दर्शनासाठी जात असताना वाहतूकीची कोंडी होत नाही. शक्तीपीठ महामार्ग हा फक्त गडचिरोलीच्या खाणीमधील बॅाक्साईट गोवा राज्यात जाण्यासाठी होणार असल्याने सामान्य जनतेला याचा कोणताच लाभ होणार नसून याऊलट जनतेच्या डोक्यावर टोलचा भुर्दंड पडणार आहे. (Shetty’s demand to Gadkari)
केंद्र सरकार करत असेलेले रस्ते व राज्य सरकार करत असलेले रस्ते या प्रकल्प किमतीत मोठी तफावत असून केंद्र सरकारपेक्षा तिप्पटीने प्रकल्पाची किंमत जादा आहे. शक्तीपीठ महामार्गातून किमान ५० हजार कोटीचा ढपला पाडला जाणार असून हा बोजा राज्यातील जनतेच्या माथी पडणार आहे. यामुळे राज्य सरकारने सदर बाबीचा गांभीर्याने विचार करून शक्तीपीठ महामार्गास स्थगिती देणे गरजेचे असल्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. (Shetty’s demand to Gadkari)