नवी दिल्ली : बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल सुधारणावरून सत्ताधारी जद(यु) खासदारानेच घरचा आहेर दिला आहे. जद(यु) चे खासदार गिरिधारी यादव यांनी बुधवारी म्हटले की निवडणूक आयोगाचा हा सराव ‘तुघलकी फर्मान’ आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांची व्यवस्था करण्यासाठी त्यांना १० दिवस लागले, असेही ते म्हणाले. (JDU MP slams EC)
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वी बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सखोल सुधारणा (SIR) कार्यक्रम सुरू केला आहे. त्यावरून वाद सुरू झाला आहे. विविध राजकीय पक्षांनीही निवडणूक आयोगाच्या या कृतीवर आक्षेप घेतला आहे. आता राज्याच्या सत्ताधारी पक्ष आणि भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जद (यु)चे बांकाचे खासदार गिरिधारी यादव यांनीही आक्षेप नोंदवत आयोगावर टीका केली आहे. (JDU MP slams EC)
संसदेबाहेर एएनआयशी बोलताना यादव म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाला व्यावहारिक ज्ञान नाही. त्यांना बिहारचा इतिहास किंवा भूगोल माहित नाही; त्यांना काहीही माहिती नाही.’’
या दिवसात जेव्हा पेरणीची घाई असते अशावेळी आम्हाला कागदपत्रांसाठी धावपळ करावी लागत आहे. मला स्वत:ला कागदपत्रे जमा करण्यासाठी दहा दिवस लागले. माझा मुलगा अमेरिकेत आहे. तो सह्या कशा करेल. काही लोकांकडे केवळ आधार कार्डच आहे. खेडोपाड्यातील लोक अक्षरश: बेजार झाले आहेत, याकडे यादव यांनी लक्ष वेधले. (JDU MP slams EC)
गिरधारी यादव म्हणाले, एसआरए आमच्यावर जबरदस्तीने लादले आहे. हा कार्यक्रम राबवायचाच होता तर त्यासाठी किमान सहा महिन्याचा कालावधी देणे गरजेचे होते, असे ते म्हणाले. हे आपले व्यक्तिगत मत आहे का असे विचारले असता ते होय म्हणाले. पण आम्ही सत्य बोलू शकत नसू तर आम्ही खासदार म्हणून निवडून कशाला आलो, असा प्रतिसवालही खा. यादव यांनी केला.