कोल्हापूर : प्रतिनिधी : महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जात असताना मुलींच्या घोळक्यात कार घुसून झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिन ठार झाली. तीन विद्यार्थिन गंभीर जखमी झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कुरुकली गावात ही घटना घडली. प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १८, रा. कौलव, ता. राधानगरी) असे मृत युवतीचे नाव आहे. (Student killed in car accident)
करवीर तालुक्यात भोगावती कॉलेज असून कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी कोल्हापूर-राधानगरी मार्गावर असणाऱ्या कुरुकली येथे बस स्टॉपवर युवती बसची वाट पहात होत्या. तर काही विद्यार्थी बस स्टॉपवर येत असताना अचानक आलेली वेगवान कार विद्यार्थिनींच्या घोळक्यात घुसली. या भीषण अपघातामध्ये प्रज्ञा दशरथ कांबळे,अस्मिता अशोक पाटील (रा.कौलव),श्रावणी उदय सरनोबत (रा.क।।तारळे),श्रेया वसंत डोंगळे (रा.घोटवडे) या विद्यार्थिनी कार खाली सापडल्या. गंभीर जखमी झालेली प्रज्ञा कांबळे ही विद्यार्थिनी ठार झाली. हा अपघात एवढा भीषण होता की प्रज्ञा कारच्या चाकात अडकून जवळपास शंभर मीटरवर फरफटत गेली. (Student killed in car accident)
कारमध्ये चार महाविद्यालयीन विद्यार्थी होते. कॉलेजमध्ये फेरफटका मारण्यासाठी ते आले होते. पण कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कारमधून चारही विद्यार्थी पळून गेले. तिथे असणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि काही पालकांनी कारचा पाठलाग करत परिते गावात कार अडवली. कारचा चालक आणि त्याच्या साथीदारांना संतापलेल्या जमावाने बेदम मारहाण केली. यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेत गाडीत असणाऱ्या चौघांपैकी दोघे पळून गेले. तर सापडलेल्या दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
प्रज्ञाच्या मृत्यूने शोककळा
अपघातात मृत्यू झालेल्या प्रज्ञा कांबळे ही वडीलांची लाडकी लेक होती. तिच्या शिक्षणासाठी वाटेल ते काम करून तिला उच्चशिक्षित बनवण्याचे त्यांनी उराशी बाळगलेल्या स्वप्नाची प्रज्ञाच्या अपघाती मृत्यूने राखरांगोळी झाली. गावावर शोककळा पसरली आहे. तिचे वडील एका शाळेत शिपाई म्हणून काम करतात. (Student killed in car accident)