Home » Blog » Kolhapur Circuit Bench : ‘कोल्हापूर खंडपीठ’ साठी नेत्यांनी दिले जनतेला श्रेय

Kolhapur Circuit Bench : ‘कोल्हापूर खंडपीठ’ साठी नेत्यांनी दिले जनतेला श्रेय

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur Circuit Bench

कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल चाळीस वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात होण्याच्या मागणीला यश आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे उधान आले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकारांना या निर्णयाने फायदा होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना खंडपीठ निर्मितीचे श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई आणि जनतेच्या लढ्याला दिले आहे.

जनतेचा लढ्याला यश : मुख्यमंत्री फडणवीस  

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात व्हावे अशी या भागातील नागरिकांची ही फार जुनी मागणी होती. अनेक वर्ष हा लढा चालला. सातत्याने ते यासाठी मला भेटायचे. पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्याला यश आले. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असे तीन खंडपीठ होतेच. त्याला आता या सर्किट बेंचची जोड असणार आहे.

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होण्यास यामुळे निश्चितपणे मोठी मदत होईल. शिवाय नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याचीही यामुळे बचत होणार आहे. (Kolhapur Circuit Bench)

शाहू छत्रपती मानले सरन्यायाधीश भूषण गवईंचे आभार

कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होणे ही काळाची गरज होती. त्यासाठी समाजातील सर्व थरातून आंदोलने झाले. सर्वांचे प्रयत्न आज यशस्वी झाले. आजचा दिवस हा आनंदाचा आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सोबत आमच्या दोन बैठका झाल्या होत्या. या बैठकीतून झालेल्या चर्चेत कोल्हापूरला सर्किट बेंच का होणे आवश्यक आहे यावर आमची चर्चा झाली होती. सरन्यायाधीश गवई देखील याबाबतीत आग्रही होते. त्यांची राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर श्रद्धा होती. या श्रद्धेपोटी तसेच कोल्हापूर सह सहा जिल्ह्यातील सर्किट बेंचच्या आवश्यकतेची जाणीव त्यांना होती.

पालकमंत्री आबिटकरांनी मानले जनतेचे आभार

कोल्हापुरात सर्किट बेंचसाठी जनतेच्या लढ्याला अखेर यश आले. आता कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात सर्किट बेंचला मंजूरी मिळाली असून कोल्हापुरात पुढच्या काळात खंडपीठ होण्यासाठीच्या पहिल्या टप्प्याला यश आले आहे. या लढ्यात योगदान दिले आहे त्या जनतेचे आभार मानतो. (Kolhapur Circuit Bench)

न्यायदानाचा मार्ग सुकर होणार : मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, न्यायदानाचा मार्ग आता अधिक सुकर होईल, असा विश्वास व्यक्त करतो.  पुणे बेंचसाठी कायदे तज्ज्ञांच्या स्थानिक शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली आहे. त्यावर मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे. त्यामुळे त्यासाठीही पाठपुरावा करू, अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.

सर्किट बेंच” वकिलांच्या एकजुटीचा विजय : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी मे.उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे, अशी गेली ४० वर्षापासूनची मागणी होती. मंजूर झालेले सर्किट बेंच हा गेली अनेकवर्षे आंदोलने, उपोषणे, निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधणाऱ्या वकिलांच्या एकजुटीचा  विजय असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.

कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे हि मागणी रास्त होती. त्यानुसार वकील आणि पक्षकारांनी लढा उभारला होता. या लढ्यामध्ये नेहमीच सहभागी होवून वकिलांच्या या मागणीस पाठींबा दिला आहे. विधिमंडळात विविध आयुधांद्वारे शासनाचे लक्ष वेधणे, मुख्यमंत्री ,उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांची भेट, पत्रव्यवहार आदींमध्ये सातत्याने पाठपुरावा केला आहे. सर्किट बेंच मुळे कोल्हापूरसह सहाही जिल्ह्यातील वकील, पक्षकारांना न्याय मिळणार आहे. हे यश खऱ्या अर्थाने वकिलांच्या एकजूटीचे आहे. (Kolhapur Circuit Bench).

कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी : माजी खासदार संभाजीराजे

आज दिल्ली येथून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे व माझे विमानातील आसन लगतच होते. यावेळी भेट होताच माननीय सरन्यायाधीश महोदय अत्यंत आनंदाने मला म्हणाले की, “राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो, कोल्हापूरचे खंडपीठ… सर्किट बेंच आजच नोटिफाय झालेले आहे.”

अगदी अचानक खुद्द देशाच्या सरन्यायाधीश महोदयांनीच दिलेली ही आनंदवार्ता ऐकून मन क्षणभर स्तिमित झाले. गेल्या अनेक वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्यातील वकील बांधवांचा खंडपीठासाठीचा सातत्यपूर्ण लढा डोळ्यांसमोर तरळला. मी खासदार असताना केंद्रीय स्तरावर केलेला पाठपुरावा नजरेसमोरून गेला. अखेर या अनेक वर्षांच्या लढ्याला यश आल्याचे समाधानही मिळाले आणि खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांकडून ही आनंदवार्ता ऐकायला मिळाली, याचेही मनोमन समाधान व हर्ष वाटला… या खंडपीठासाठी लढा दिलेले वकील बांधव व सर्व कोल्हापूरकर व पश्चिम महाराष्ट्रातील जनता यांचे मन:पूर्वक अभिनंदन !

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00